निकृष्ट खाद्यपदार्थ आरोग्यासाठी घातक
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
निकृष्ट खाद्यपदार्थांमुळे विविध प्रकारच्या विषबाधा होण्याच्या घटना दिवसेंदिवस विविध ठिकाणी घडताना दिसत आहेत. बहुतांश आजार हे अशा प्रकारचे खाद्यपदार्थ सेवन केल्याने होत आहेत. व्यस्त जीवनशैली व दररोजची दगदग यामुळे बहुतांशी कुटुंबे आज बाहेर हॉटेलचे जेवण पसंत करतात. काही लोक रोजच्या चवीतून बदल म्हणूनदेखील रेस्टॉरंटमध्ये नियमित जेवायला जातात. मात्र हॉटेल्समधील खाद्यपदार्थ आरोग्यास घातक ठरत असल्याचे वारंवार निदर्शनास येत आहे. हे खाद्यपदार्थ चवीला जरी चांगले वाटत असले तरी त्याचे शरीरावर विपरीत व दूरगामी परिणाम ठरलेले असतात. आपल्याला रोजच्या जीवनात अनेक खाद्यपदार्थांची गरज लागते. आधुनिक जीवनशैलीमुळे अनेक कुटुंबे न्याहरीसह जेवणात बेकरीचे पदार्थ मोठ्या प्रमाणात वापरत असल्याचे चित्र आहे. बेकरी पदार्थांचा खरेदीदार वाढल्याने या पदार्थांच्या उत्पादनात कमालीची वाढ झाली आहे. त्यामुळेच आपल्याला आज गल्लीगल्लीत बेकरीची दुकाने थाटलेली प्रकर्षाने जाणवतात. मात्र या बेकरी उत्पादनांवर कोणाचेही नियंत्रण नसल्याचे सध्याचे चित्र आहे. स्वस्त व भूक भागवण्यास चांगले अशी ओळख असलेल्या ह्या पदार्थांची निर्मिती जर आपण खोलात जाऊन पाहिली तर हे पदार्थ सेवन करणे किती घातक ठरू शकेल हे आपल्या लक्षात येईल. बेकरीचे पदार्थ बनवताना चांगला दर्जा व गुणवत्तापूर्ण कच्चा मालाचा वापर फार अपवादानेच टिकवला जातो. मात्र होलसेलच्या नावाखाली अशा पदार्थांची जोमाने सुरू असलेली विक्री चिंतेची बाब आहे. फरसाण, पापडी, शेव यासह डाळीच्या विविध पदार्थांमध्ये डाळीऐवजी मक्याचे पीठ वापरले जात असल्याची अनेकदा स्पष्ट झाले आहे. गल्लीबोळात तयार झालेले अशा पदार्थांच्या कारखान्यात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात असल्याचीदेखील अनेकांची तक्रार आहे. त्याचे पीठ मळण्यासाठी अनेकदा मशीनऐवजी मानवी पायांचा वापर केला जातो. पाणी व इतर साहित्यादेखील खराब अवस्थेतील वापरण्यात येते. शिवाय असे पदार्थ पारदर्शक प्लास्टीकमध्ये पॅक केले जातात. त्यावर उत्पादन तारखेसह अन्य कोणतीही माहिती दिलेली नसते. शिवाय होलसेलच्या नावाखाली त्यांची किंमतही कमी असल्याने अनेकांकडून त्याची खरेदी केली जाते. यामुळे परवान्यासह सर्व अटींची पूर्तता करून खाद्यपदार्थ तयार करणार्यांना मोठा फटका बसत आहे. भेसळ व निकृष्ट दर्जा यामुळे मानवी आरोग्य बिघडवण्याचे काम असे पदार्थ करत असतात. छोटी दुकाने, पान टपर्या या ठिकाणी असे पदार्थ सर्रास विक्रीला ठेवले जातात. या पदार्थांसह विविध प्रकारची बिस्कीटे, मिठाई, केक याचेही उत्पादन केले जाते. अशा कारखान्यांतील स्वच्छता, तेथे वापरल्या जाणार्या कच्च्या पदार्थांची गुणवत्ता याकडे मात्र साफ दुर्लक्ष केले जात आहे. याची खरेदीदारांना माहिती नसल्याने या पदार्थांची जोमाने विक्री होत आहे. प्रमुख्याने लहान मुलांमध्ये हे पदार्थ फार प्रसिद्ध असल्याने त्यांचे आरोग्यदेखील धोक्यात येत आहे. अशा पदार्थांमध्ये भेसळ तर होतेच शिवाय मुदत संपलेले पदार्थही ग्राहकांच्या माथी मारले जात आहेत. या पदार्थांसह हातगाड्यांवर विकल्या जाणार्या दक्षिण भारतीय, पंजाबी, गुजराती आणि चायनीज पदार्थांची याहून भयानक स्थिती आहे. बहुतांशी हातगाडे चालकांकडे अन्न विभागाचा परवानाच नसल्याचे दिसून येत आहे. अशा हातगाड्यांवर केवळ दंडात्मक किंवा सुधारणा करण्याची नोटीस अशी जुजबी कारवाई केली जाते. मात्र काही दिवसांतच हे विक्रेते पुन्हा त्याच जागेवर ठाण मांडून लोकांचे आरोग्य बिघडवण्याचे काम जोमाने करत असतात. उघड्यावरील, दर्जाहीन, भेसळयुक्त पदार्थांमुळे कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांच्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता बळावली आहे. संसर्गाने हे आजार पसरत असल्याने एकमेकांच्या सानिध्यात येणारे लोकदेखील त्याला बळी ठरू शकतात. खाद्यपदार्थांसह अन्न विभागाकडे गुटखा, मावा, सिगारेट अशा नशिल्या पदार्थांवरही कारवाई करण्याचे अधिकार आहेत. गेल्या काही वर्षांमध्ये अन्न व औषध प्रशासन विभागाने कारवाई करत अनेक ठिकाणी असे नशेचे पदार्थ, तंबाखू व गुटखा पकडला. खरेतर स्थानिक प्रशासनामार्फत अशा अवैध धंद्यांवर नियमित कारवाई केली गेली पाहिजे. कारवाईचे सत्र मोठ्या प्रमाणावर सुरू असूनदेखील आज बहुतांशी पान टपर्यांसह दुकानांमध्ये गुटखा सर्रास विकला जातो. रेल्वे स्टेशन व डब्यांमध्येदेखील विक्रेते बिनधास्तपणे तंबाखूची उत्पादने विकत असल्याचीदेखील दिसून येते. याला रेल्वे कर्मचारीदेखील मूक समर्थन देत असल्याची शंका उपस्थित होते. माव्यात वापरल्या जाणार्या सुगंधी तंबाखूचीही तिच अवस्था आहे. आज गुटखा आणि मावा सर्वत्र सर्रास विकला जात आहे. बहुतांशी शहरांमध्ये चायनीज, भेळ व पाणीपुरीसारखे पदार्थ विकणारे अनेक हातगाडे दिसून येत आहेत. अगदी गटारीच्या कडेला उभे राहून असे पदार्थ विकले जातात. जिभेचे चोचले पुरविणार्यांना तेथील स्वच्छता आणि त्यात वापरलेल्या जाणार्या पदार्थ, रंगांचे दुष्परिणाम दिसत नाहीत. अशा गाड्यांवर कारवाईची गरज आहे. शिवाय गल्ली-बोळात फिरणारे पाणीपुरीवाले कोणते पाणी वापरतात, त्यांची स्वच्छता आणि पदार्थांची गुणवत्ता तपासणार कोण, असा प्रश्न आहे. अशा काही व्यावसायिकांकडे परवानेही नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे अशांवर कारवाईसाठी व्यापक मोहिमेची गरज लक्षात घेता प्रशासनाने आता याविरोधात तीव्र मोहीम हाती घेण्याची गरज आहे. मोठमोठी रेस्टाॅरंटस् रोज 50 लीटरपेक्षा जास्त तेल तळण्यासाठी वापरतात. त्याची शुद्धता व दर्जा हा संशोधनाचा विषय ठरू शकेल मात्र आता या हाॅटेल्सना रेकाॅर्ड ठेवणं बंधनकारक असताना किती हॉटेल्स चालक हा नियम पाळतात हेही तपासून पाहायला हवे. एफडीएच्या कारवाईत पारदर्शकता व सातत्य गरजेचे आहे. फूड रेग्युलेटर FSSAI या नव्या आदेशामुळे बऱ्याच गोष्टींना चाप बसलेला आहे. फॅट्समुळे हृदयविकार बळावतो. एकदा पदार्थांसाठी वापरलेले तेल पुन्हा वापरलं तर तेलात जास्त फॅट्स तयार होतात. नियमांची काटेकोर अंमलबजावणी केली तर ह्या नियमांमुळे ठेवलेले उद्दिष्ट सफल व्हायला वेळ लागणार नाही. काही महिन्यांपूर्वी FDAने एक धक्कादायक वास्तव जाहीर करत महाराष्ट्रातली बहुतांश हॉटेल्स खाण्याच्या दृष्टीनं असुरक्षित आहेत असे म्हणत नियमित बाहेरचे खाणाऱ्यांना दणका दिला आहे. सँपल म्हणून सर्व्हे केलेल्या हॉटेल्सपैकी बहुतेक हॉटेल्समध्ये स्वच्छतेचे नियम पाळलेले नव्हते. मुंबईतली अनेक हॉटेल्स, पब्ज, रेस्टॉरंट्स आणि फूड जॉइंट्समध्ये मिळणारं अन्न सुरक्षित नाही, असा अहवाल अन्न आणि औषध प्रशासनानं दिला होता. अन्न शिजवण्यासाठी वापरली जाणारी भांडी, किचनची स्वच्छता, कर्मचाऱ्यांनी घ्यायची काळजी, कचऱ्याची विल्हेवाट याबाबतीत FDAने काही नियम घालून दिले आहेत. बहुतेक सर्वजण यातले अनेक नियम पायदळी तुडवताना दिसत आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी निगडित रोजच्या वापरातील खाद्यपदार्थात भेसळीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. थोड्या नफ्यासाठी उत्पादक व विक्रेते लोकांच्या आरोग्याशी व जीवाशी खेळत आहेत. हे उचित नसून त्यावर अंकुश आणणे गरजेचे आहे. लोकांनीदेखील हॉटेल्समध्ये खाताना पदार्थांचा दर्जा तपासला पाहिजे. अनुचित प्रकार व निकृष्ट दर्जाचे खाद्यपदार्थ आढळले तर लागलीच तक्रारी करायला हव्यात. आपले आरोग्य व शरीर निरोगी राखण्याची जबाबदारी आपलीच असून बाहेरील खाद्यपदार्थांबाबत आपण दाखवलेली जागरूकता आपले स्वतःचे, कुटुंबाचे व समाजाचे स्वास्थ्य अबाधित राखण्यास मदत करेल एव्हढे नक्की.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment