Posts

Showing posts from July, 2022

निरोगी शरीरासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे

Image
पावसाळा हा वातावरणातील गारव्यामुळे सुखावणारा असला तरी तो अनेक साथीचे आजारदेखील घेऊन येत असतो ही बाब ध्यानात ठेवली पाहिजे. त्यामुळे साथीच्या आजारापासून प्रत्येकाने स्वतःचे व कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी दक्ष असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात मुख्यत्वे सर्दी, ताप, डोकेदुखी, डेंग्यू, हिवताप यासारखे जलजन्य आजार पसरत असतात. दूषित पाणी व वातावरणातील बदलांमुळे हे आजार डोके वर काढतात. त्यामुळे पावसात फिरताना तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत योग्य काळजी न घेतल्यास आपण या आजारांना बळी पडतो. पावसाळ्यात पाणी गाळून व उकळूनच प्यायला हवे. ओलसर कपडे व पावसाच्या पाण्यात भिजणे शक्यतो टाळले पाहिजेत. महत्वाचे म्हणजे वर उल्लेख केलेल्या आजारांची कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास तातडीने आवश्यक चाचण्या व उपचार करायला हवेत. पावसाळ्यात राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झालेल्या आहेत. साथपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सरकारने हाती घेतलेल्या आहेत. त्यामुळे आजारपणात सरकारी दवाखान्यांत औषधोपचार लाभदायी ठरेल. आज ग्रामीण व शहरी भागांत अनेक सरकारी दवाखाने व रुग्णालये लोकांच्या सेवेत अविरत दिव...

डॉ कारभारी खरात आरोग्य सेवेतून सेवानिवृत्त

Image
आरोग्य सेवा आयुक्तालयातील एक अभ्यासू व कार्यक्षम अधिकारी डॉ कारभारी खरात सर आज नियत वयोमानाने शासन सेवेतून सेवानिवृत्त झाले. आरोग्य सेवेत तब्बल ३२ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावलेले खरात सर ग्रामीण व दुर्गम भागाशी नाळ जुळलेलं व्यक्तीमत्व आहे. जव्हार, मोखाडा सारख्या दुर्गम भागात सेवा बजावलेल्या खरात सरांनी रायगड, ठाणे, अहमदनगर या जिल्ह्यांमध्येही आरोग्य अधिकाऱ्याची भूमिका चोखपणे वठवली. त्यांचा मितभाषी व संयमी स्वभाव त्यांच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांनाही भावायचा. यामुळे ते प्रशासकीयदृष्ट्या काहीसे डावे ठरत असले तरी जिथे सेवा बजावायचे तिथे कर्मचारी वर्गामध्ये प्रिय होऊन जायचे. राज्याच्या अनेक दुर्गम भागात सेवा बजावल्यानंतर त्यांनी साधारणतः दीड दोन वर्षांपूर्वी आरोग्य सेवा संचालनालयात सहाय्यक संचालक (मुख्यालय) म्हणूनही सेवा बजावली. त्यानंतर भिवंडी महानगरपालिकेसारख्या महत्वाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेतही त्यांनी कोविड साथ काळात मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणून महत्वपूर्ण व परिणामकारक सेवा बजावली. साधारणतः तीन महिन्यांपूर्वीच पुन्हा आरोग्य सेवा मुख्यालयात परतत त्यां...

तर विराटने क्रिकेटपासून दूर व्हावे

Image
एकेकाळी क्रिकेट विश्वात नंबर एकचा खेळाडू असलेला विराट कोहली सध्या खराब खेळीमुळे क्रिकेटरसिकांच्या टीकेचा धनी बनलेला आहे. सध्याच्या इंग्लड दौऱ्यातदेखील त्याने पुरती निराशा केली आहे. त्यात आता आगामी वेस्ट इंडिज मालिकेसाठी त्याने विश्रांती देण्याची मागणी केली आहे. यावरून त्याचा आत्मविश्वास हरवत चालल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पहिल्या फळीतील खेळाडूंनी देशासाठी खेळताना आपल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी झालेल्या चुका शोधून त्यावर मात करणे अपेक्षित आहे. मात्र विराटने त्यातूनही पळ काढत नेमके देशासाठी खेळण्याच्या वेळी विश्रांतीची केलेली मागणी योग्य ठरत नाही. आयपीएलसारख्या अर्थकमाईच्या प्रकारांत हे खेळाडू अविश्रांत खेळत राहतात. मात्र देशासाठी खेळण्याच्या वेळी मनाजोगे, हवे तेव्हा खेळण्याची भूमिका ठेवतात ही भारतीय क्रिकेटसाठी भूषणावह बाब नाही. त्यामुळे खेळात सातत्य ठेवता येत नसेल व चांगली कामगिरी करण्याची इच्छाशक्ती नसेल तर विराटने भारतीय संघातील जागा अधिक काळ न अडवता क्रिकेटपासून दूर झालेले बरे!  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेची तयारी करणाऱ्या मुलांसाठी दिलासा

Image
दिल्लीत राहून केंद्रीय लोकसेवा आयोग व स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठा दिलासा दिला आहे. दिल्लीत महाराष्ट्र सदनातील काही खोल्या तसेच शासनाच्या अखत्यारीतील जागेत जवळपास ५०० खोल्यांची स्वतंत्र इमारत दिल्लीत राहून अभ्यास करणाऱ्या मुलांसाठी बांधण्याची घोषणा त्यांनी केली आहे. यामुळे यूपीएससीच्या विद्यार्थ्यांना मोठी मदत मिळणार आहे. राज्यातील हुशार व होतकरू मुले दिल्लीत राहून अनेक वर्षे स्पर्धा परीक्षांची तयारी करत असतात. दिल्लीत राहून अभ्यास करणे या मुलांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठी खर्चिक बाब ठरते. यामुळे अनेक मुले सनदी सेवेचे प्रयत्न अर्धवट सोडून राज्यात परततात व मिळेल ती नोकरी पत्करतात. अशा मुलांना राज्य शासनामार्फत दिल्लीत निवासाची सोय झाल्यास ते अधिक जोमाने अभ्यास करून प्रशासकीय सेवेसाठी प्रयत्न करतील. तसेच अभ्यासादरम्यान आर्थिक बोजा कमी पडल्यामुळे सर्वसामान्य पालकदेखील मुलांना अशा परीक्षांसाठी प्रवृत्त करतील. त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा नक्कीच स्वागतार्ह असून ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी असे वाटते...

सांघिक विजय ही जमेची बाजू

Image
इंग्लंडमधील मालिका विजयांसह भारतानं अनेक विक्रमही आपल्या नावावर केलेत. टीम इंडिया २०१५ पासून गेल्या आठ वर्षांत वनडे मालिका जिंकणारा इंग्लंडमधील दुसरा संघ आहे. यादरम्यान इंग्लंडने सात संघांविरुद्ध १५ द्विपक्षीय एकदिवसीय मालिका खेळल्या आहे. भारताव्यतिरिक्त ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा २०१५ मध्ये आणि २०२० मध्ये पराभव केला होता. भारतीय संघानं २०१५च्या एकदिवसीय विश्वचषकापासून इंग्लंडविरुद्ध आठ एकदिवसीय आणि टी २० मालिका खेळल्या आहेत. यापैकी टीम इंडियाने सात मालिका जिंकल्या. केवळ २०१८ मध्ये इंग्लंडनं घरच्या मैदानावर एकदिवसीय मालिकेत भारताला २-१ ने पराभूत केलं होतं. उर्वरित सात मालिका भारतानं घरच्या मैदानावर आणि इंग्लंडमध्ये जिंकल्या आहेत. इंग्लंड हा संघ घरच्या मैदानावर सर्वात प्रबळ संघ म्हणून ओळखला जातो. त्यामुळे त्याला पराभूत करून भारतीय संघाचे मनोधैर्य नक्कीच वाढले आहे. विराट कोहली सारखे भारताचे काही खेळाडू खराब फॉर्ममुळे झगडत असले तरी सांघिक विजय ही त्यातल्या त्यात जमेची बाजू आहे. भारतीय संघाने आपली ही यशस्वी वाटचाल अशीच कायम सुरू ठेवावी असे वाटते.   वैभव मोहन प...

गुन्हेगारी प्रवृत्तीचे उदात्तीकरण

Image
झी मराठीवरील देवमाणूस या मालिकेत गुन्हेगारी प्रवृत्तीला खतपाणी घातले जात आहे. खून, अत्याचार, आर्थिक अपहार, बोगस डॉक्टरकी, फसवणूक यासारखे अनेक गुन्हे करून सहीसलामत वावरत असलेला डॉ अजितकुमार उर्फ देवीसिंग अजूनही पोलिसांच्या हाती लागायला तयार नाही. उलट इन्स्पेक्टर जामकर ह्या एका कर्तव्यदक्ष पोलिसालाच तो थेट खुले आव्हान देताना मालिकेत दिसतो. एक महिला आमदाराला हाताशी धरून तिचा काळा पैसा व सोने पांढरा करण्याचे काम करणारा डॉक्टर अजित तिच्या सांगण्यावरून तिच्या माजी आमदार असलेल्या पतीला कुणीही साथीदार नसताना स्वतः एकटाच अपहरण करून गावातच गायब करतो ही कुणालाही न पटणारी अतिशयोक्ती आहे. भामटेगिरीशिवाय इतर कुठलेही उद्योग न करणारा गर्भश्रीमंत असलेला डॉक्टर, त्याच्यावर अंधविश्वास ठेवणारे गावकरी, पैशासाठी त्याला प्रत्येक गुन्ह्यात मदत करणारी त्याची पार्टनर डिंपल व सर्वकाही माहीत असूनही त्याचे काहीही बिघडवू न शकलेले हतबल पोलीस हे सर्व दर्शकांची निराशा करतात. अन्याय, अत्याचार, लबाडी, खून करणाऱ्या गुन्हेगारी प्रवृत्तीचे इतके उदात्तीकरण शोभनिय नाही.  वैभव मोहन पाटील  घणसो...

पारदर्शक प्रशासन हवे

Image
पावसाळा सुरू झाला की रस्त्यांची अवस्था सगळीकडेच अत्यंत दयनीय होऊन जाते. अनेक ठिकाणी तर वर्षभर रस्त्यांची कामे चालतात. त्यासाठी मोठमोठी कंत्राटे दिली जातात. मात्र या ठेक्यांमध्ये टक्केवारीच इतकी मुरलेली असते की ती निघून गेली की रस्त्यांचा दर्जा गर्भगळीत झालेला असतो. रस्ता तयार झाला की वर्षभरातच त्याची खडी व डांबर उघडे पडायला लागते. अशा रस्त्यांवरील खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. पावसाळ्यात ह्या खड्ड्यांमध्ये पाणी साचत असल्याने अंदाज न आल्याने अनेक अपघात होतात. वाहतूक कोंडी व इंधनाचा अपव्यय देखील ओघाने आलाच. या समस्येकडे गांभीर्याने पाहिले न गेल्याने वर्षानुवर्षे ही परिस्थिती बदलू शकलेली नाही. यात कंत्राटदार, लोकप्रतिनिधी व प्रशासनातील काही घटक सामील असल्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. शहरी भागातील रस्त्यांवर दरवर्षी दुरुस्तीची नवी कंत्राटे काढून मलमपट्टी केली जाते मात्र ग्रामीण भागातील रस्ते वर्षानुवर्षे देखभालीविना राहतात. त्यामुळे एकीकडे कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेले टोलयुक्त चकाचक महामार्ग तर दुसरीकडे वर्षान...

खर्चाच्या परताव्याची योजना हवी

Image
दुभत्यांचा दुर्विलास हे संपादकीय (दै लोकसत्ता १९ जुलै) वाचले. या लेखातून काही मुद्दे प्रकर्षाने उद्भवतात. प्रथमतः एमएमआरडीए ही स्वायत्त व सक्षम संस्था असताना राज्य सरकार या अवाढव्य संस्थेस कर्ज उभारण्याची अनुमती देण्यामागील गणित कळत नाही. एमएमआरडीएने आज मुंबई व महाराष्ट्रात अनेक मोठमोठे प्रकल्प उभारले आहेत. हे प्रकल्प महसुली नसले तरी त्या प्रकल्पातून उभारण्यात येणाऱ्या निधीतून नवे प्रकल्प हाती घेता येऊ शकतील. दुसरे म्हणजे राज्यातील इतक्या श्रीमंत मंडळाला कर्ज उभारण्याची वेळ येतेच कशी याचाही उलगडा व्हायला हवा. राज्य अथवा केंद्र शासनाच्या पाठबळातून लोकोपयोगी प्रकल्प एमएमआरडीएने बीओटी तत्वावर उभारावेत. एमएमआरडीएने घेतलेल्या कर्जाचा लेखाजोखा शासन दप्तरी नसल्याने या संस्थेने कितीही कर्ज घेतले तरी राज्यावरचा कर्जाचा डोंगर त्याने मोठा होत नाही. पण म्हणून निधी उभारण्यासाठी या संस्थेचा वापर कितपत योग्य याचाही विचार व्हायला हवा. मेट्रो, सागरी पूल, पूर्व द्रुतगती महामार्ग व इतर महसुली उत्पन्नात फार भर न टाकणारे प्रकल्प उभारताना या प्रकल्पांसाठी लागल...

डिजिटल व्यवहारांचे यश

Image
गेल्या काही वर्षांमध्ये देशातील डिजिटल व्यवहारांचे प्रमाण बऱ्याच अंशी वाढले आहे. प्रधानमंत्री जनधन योजना व डिजिटल भारत अभियानाचा सकारात्मक परिणाम ऑनलाईन व्यवहारांवर झालेला आहे. जनधन योजनेंतर्गत कोट्यवधी नागरिक बँकिंग व्यवहारांच्या परिक्षेत्रात आले. ३१३ सरकारी योजनांमधून चालू वर्षी अब्जावधी रुपयांचा निधी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात दिला गेला आहे. आज खुल्या बाजारपेठांमध्ये किरकोळ व घाऊक व्यापारी बहुतांशी डिजिटल पेमेंट प्रणाली वापरत आहेत. मोबाईलमधील विविध ऍप्लिकेशनच्या आधारे थेट पेमेंट करता येत असल्याने लोकांचीदेखील सुट्टे पैसे व नगदी व्यवहारांच्या जंजाळापासून सुटका झाली आहे. थेट खात्यातून खात्यात आर्थिक व्यवहार होत असल्याने देश खऱ्या अर्थाने डिजिटल अर्थक्रांतीकडे वाटचाल करत आहे याबाबत दुमत नाही. याला कारणीभूत सरकारी व आरबीआयचे डिजिटल धोरण मानता येईल. मात्र अद्यापही सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीसारख्या ठिकाणी रोखीने व्यवहार केले जात आहेत, त्याकडे लक्ष केंद्रित करण्याची आवश्यकता आहे. डिजिटल व्यवहारांमधील नेटवर्क, सर्व्हर प्रॉब्लेम यासारख्या तांत्रिक त्रुटी दूर करण्यासाठी प्रयत्न गर...

भ्रष्टाचार दूर झाला तर रस्त्याची गुणवत्ता व दर्जाही सुधारेल

Image
मुंबईत ठिकठिकाणी वर्षभर रस्त्यांची कामे केली जातात. त्यासाठी मोठमोठी कंत्राटे दिली जातात. मात्र पावसाळा सुरू झाला की या रस्त्यांवर खड्डे पडून त्या रस्त्यांची अक्षरशः चाळण होऊन जाते. खड्ड्यातून वाट काढताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागते. खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचत असल्याने अंदाज न आल्याने अनेक अपघात होतात. वाहतूक कोंडी व इंधनाचा अपव्यय देखील ओघाने आलाच. या समस्येकडे गांभीर्याने पाहिले न गेल्याने वर्षानुवर्षे ही परिस्थिती बदलू शकलेली नाही. यात कंत्राटदार, लोकप्रतिनिधी व प्रशासनातील काही घटक सामील असल्यामुळे रस्त्यांवरील खड्ड्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जाते. वास्तविक मुंबईसारख्या आर्थिक राजधानीतील रस्ते पाच दहा वर्षांच्या देखभाल दुरुस्तीसाठी एखाद्या नामांकित कँपनीकडे देणे आवश्यक आहे. तसेच रस्त्यांवर ठिकठिकाणी ज्या ठेकेदाराने दुरुस्ती केली असेल त्याचे नाव, संपर्क, कामासाठी आलेला खर्च व कामाची मुदत नमूद केलेले फलक लावले गेले पाहिजेत जेणेकरून लोकांना त्या रस्त्याची डागडुजी कोण ठरतेय हे कळेल. रस्ते कामातील भ्रष्टाचार दूर झाला तरच रस्त्यांची गुणवत्ता व दर्जा सुधा...

प्रधानमंत्री मातृ वंदना योजना

Image
माता व बालकांचे आरोग्य महत्वाचे माता व बालकांचे निरोगी व सुदृढ आयुष्य आज प्रत्येक कुटुंबाच्या दृष्टीने प्राधान्‍याचा विषय आहे. कोरोनासारख्‍या जागतिक संक्रमणकाळात तर कौटुंबिक आरोग्‍य अबाधित राखणे आपल्‍या सर्वांसाठी अत्‍यंत आवश्‍यक झाले असुन आपल्‍या प्रत्‍येकाच्‍या आयुष्‍यात निरोगी व सुदृढ शरीराचे महत्‍व अधोरेखीत झाले आहे. शासनाकडून माता व बाल आरोग्‍यविषयक अनेक योजना राबिवण्‍यात येत आहेत ज्‍यामध्‍ये जननी शिशु सुरक्षा कार्यक्रम, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम, मिशन इंद्रधनुष्य, नियमित लसिकरण, पल्स पोलिओ मोहिमा, जननी सुरक्षा योजना, नवजात शिशु उपचार, माहेर घर योजना यासारख्‍या आरोग्य योजनांचा समावेश होतो. माता बाल आरोग्य विषयक कार्यक्रमांमुळे राज्यातील माता मृत्यू व बालमृत्यूचे प्रमाणदेखील गेल्या काही वर्षांपासुन आटोक्यात आलेले आहे. अशाच एका महत्‍वपूर्ण योजनेची माहिती आज आपण सविस्‍तर जाणून घेऊ या. गर्भवती महिलेचे आरोग्‍य, आहार या बाबी सुदृढ बालकासाठी खूप गरजेच्‍या आहेत. यासाठी गर्भवती महिला व स्तनदा मातेला सकस आहार मिळणे अत्‍यंत महत्वाचे आहे. यासाठी त्यांना प्रोत्स...

'प्रत्येकाने आयुष्यात किमान दोन झाडे तरी लावावीत'

Image
आरसीएफ हरित चेंबूर प्रकल्पांतर्गत यूथकौन्सिल नेरुळचा वृक्षपूजन व वृक्षारोपन उपक्रम .... 'प्रत्येकाने आयुष्यात किमान दोन झाडे तरी लावावीत' नवी मुंबई (सुभाष हांडे देशमुख) : विविध रस्ते, नागरी वसाहती, नवनवे प्रकल्प यामुळे सर्वात अधिक नुकसान झाले असेल ते झाडांचे; प्रगती, सोयी, सुविधा तर हव्या आहेतच. मग हे नुकसान भरुन काढायचे असेल तर प्रत्येकाने किमान दोन तरी झाडे लावून त्यांचे संगोपन करावे असे आवाहन ज्येष्ठ नागरिक संघ, नेरुळचे अध्यक्ष अरविंद वाळवेकर यांनी नेरुळ येथे केले. आषाढी एकादशी निमित्त गजानन महाराज भक्त मंडळ, वाशी व यूथकौन्सिल नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने, आर.सी.एफ हरित चेंबूर प्रकल्पांतर्गत,  नेरुळ येथील यूथकौन्सिल संस्थेच्या सावली रोपवाटिकेत  आयोजित *वृक्षपूजन, वृक्षारोपण कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे म्हणून १० जुलै रोजी ते बोलत होते.* **यूथकौन्सिलच्या कार्याचा गौरव करून, संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा दाखला देत, आषाढी एकादशी व झाडांचे महत्व विशद करुन ते पुढे म्हणाले की, आपण निसर्गाशी बांधील आहोत. म्हणून वृक्षारोपण करण महत्त्वाचं आहे. प्रत्येकाने दोन झा...

पावसाळापूर्व कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारावी

Image
पावसाळ्यात ठिकठिकाणी पाणी तुंबण्याची परिस्थिती मुंबईत नवी नाही. नालेसफाईचे कितीही दावे पालिकेच्या वतीने करण्यात आले तरी काही ठराविक ठिकाणी थोड्या पावसातदेखील दरवर्षी पाणी भरते. यामुळे वाहतूक व रहदारीला मोठ्या प्रमाणात अडथळा होत असल्याने अशा ठिकाणी पालिकेची आपत्ती यंत्रणा सतर्क असायला हवी. सखल भाग, डोंगर पायथा, रेल्वे रूळ अशा ठिकाणी पाणी भरण्याच्या घटना नित्याच्याच झाल्यात. उपनगरीय लोकल सेवा व लांब पल्ल्यांच्या रेल्वे गाड्यांचे मोठे जाळे असलेल्या मुंबई नगरीत पावसामुळे रेल्वे वाहतुकीस सातत्याने अडथळा येतो. पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्याचे काम महानगरपालिकेचे असताना वर्षानुवर्षे सुरू असलेली ही परिस्थिती अद्यापि सुधारु शकलेली नाही. मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण उडल्याच्या घटना अनेकदा घडलेल्या आहेत. यात महानगरपालिकेचे पितळ उघडे पडले आहे. पाणी वाहून नेणारे नाले, गटारे, नद्यांची स्वच्छता नियमित व व्यवस्थित केली तर ही परिस्थिती बदलू शकते. तसेच पावसाच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्याच्या सूचना गृहनिर्माण संस्थांना देखील दिल्यासदेखील परिस्थिती थोडी बदलेल. तसेच पावसाळापूर्व स्थ...

कसे जायचे इतक्या दूर, आमचे इथेच पंढरपूर

Image
आषाढी निमित्त काटी गावात विद्यार्थ्यांनी काढली दिंडी https://youtu.be/Hqbg6iHeZds आषाढी एकादशी निमित्त पालघर जिल्ह्यातील काटी (ता वाडा) या दुर्गम गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी गावात तसेच हनुमान मंदिर परिसरात दिंडीचे आयोजन केले. आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्रभरातून लाखो वारकरी भाविक पंढरपूर येथे पांडुरंगाच्या दर्शनाला जात असतात. वाडा तालुक्यातून देखील पायी दिंडीतुन तसेच निरनिराळ्या वाहनांमधून पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. मात्र यंदा पावसामुळे अनेकांच्या वारीवर मर्यादा आल्या. त्यांना वारकरी दिंडीचा आनंद गावातच मिळावा यासाठी जिल्हा परिषद शाळेतील मुलांनी गाव परिसरात काढलेल्या दिंडीचे सर्व स्तरांतून स्वागत करण्यात आले. विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या छोट्या वारकऱ्यांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. शाळेचे मुख्याध्यापक श्री जाधव सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या ह्या दिंडी उपक्रमास ग्रामस्थांकडूनदेखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन व जतन करणाऱ्या ह्या उपक्रमामुळे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून शाळेचे कौ...

हे राजकीय समीकरण

Image
मुळात भाजप हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघप्रणित राजकीय पक्ष आहे. हिंदुत्ववादी विचारसरणीचा मोठा पगडा या पक्षावर आहे. दलित, ब्राह्मण, मराठा अशी जातीय समीकरणे गेल्या काही वर्षांपासून राजकीय सोयीसाठी आणली जात आहेत व त्याचा फायदा राजकीय पक्ष उचलताना दिसत आहेत. सध्या महाराष्ट्रात मोठ्या राजकीय नाट्यमय घडामोडीनंतर मागील ५ वर्षे मुख्यमंत्रीपदाची धुरा यशस्वीरीत्या सांभाळलेले देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत असताना त्यांना केंद्रीय भाजप नेतृत्वाने सोयीस्कररित्या दूर ठेवले. यामुळे भाजपमध्ये ब्राम्हणांचे खच्चीकरण होत असल्याचे ब्राम्हण महासंघाचे म्हणणे मात्र विसंगत आहे. मुळात नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतर भाजपने सर्वसमावेशक धोरण अवलंबले व  अनेक राज्यांमध्ये स्थानिक राजकीय परिस्थीतीनुसार नेत्यांना पदवाटप केले. त्यात ब्राह्मणवादी विचारसरणीचा पगडा सकृतदर्शनी दिसत नाही. महाराष्ट्र हे सर्वधर्मसमभाव जोपासणारे राज्य असले तरी राज्याला जातीय परंपरेचा मोठा वारसा आहे जो समाजात मुळापर्यंत रुतलेला आहे. भाजपकडे बहुमत असताना व फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी स्पष्ट शक्यता असताना...

जेनेरिक औषधे - रुग्णांसाठी वरदान

Image
कोरोनाने आर्थिक कंबरडे मोडलेल्या गरीब व दुर्बल घटकांसाठी विविध आजारांवरील औषधांचा वाढता खर्च बेजार करणारा आहे. उपचारांपेक्षा औषधांचा खर्च रुग्णांना न परवडणारा झाला आहे. प्रधानमंत्री भारतीय जन औषधी परियोजनेच्या माध्यमातून साधारणतः १४ वर्षांपूर्वी एक उत्तम व स्तुत्य योजना केंद्र सरकारने अस्तित्वात आणली. जेनेरीक औषधांच्‍या माध्‍यमातुन गरीब व मध्‍यमवर्गीय रुग्‍णांना औषधांवरील खर्चासाठी आशेचा किरण निर्माण झाला.  मात्र औषधनिर्माते, विक्रेते व वैद्यकीय क्षेत्रातील काही घटकांची निरसता यामुळे ही योजना फार प्रभावी ठरली नाही. सर्वांसाठी मोफत औषधोपचाराचे धोरण ठेवणाऱ्या सरकारचे हे अपयशच मानावे लागेल. जेनेरिक औषधांची पुरेशी जनजागृती करण्यातदेखील तोकडेपणा जाणवतो. देशातील साडेआठहजार जेनरीकची औषधालये आज कुठल्या अवस्थेत आहेत याचा लेखाजोखा एकदा करायला हवा. या क्षेत्रात उतरून काम करणाऱ्या घटकांच्या समस्या व अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न झाले तर आणखी लोक त्यात हिरीरीने सहभाग घेतील. जेनरीक औषधांवरील सरकारी अनुदानात वाढ व खरेदी-विक्रीत सुलभता आणली तर या योजनेचा प्रसार नक्कीच वाढेल. सरकारी पातळीव...

पायावर उभे करणारे शिक्षण हवे

Image
दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या पदवी व व्यावसायिक शिक्षणाच्या वाटा खुल्या होतात. पूर्वीचे शिक्षण एका साचेबद्ध पद्धतीने घेतले जायचे. बारावीनंतर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नंतर उच्च शिक्षणाचे पर्याय निवडले जायचे. कालपरत्वे शिक्षण पद्धतीत बदल होत गेले. करीअर व रोजगाराच्या अनुषंगाने मुलांचा व्यावसायिक शिक्षणाकडे कल वाढत गेला. दूरस्थ शिक्षण पद्धतीने पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याचे पर्याय खुले झाल्याने मुलांचा व्यावसायिक शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्याचा मार्ग अधिकच सुकर झाला. त्यामुळे बारावीपर्यंतचे शिक्षण एखाद्या महाविद्यालयात घेतलेले विद्यार्थी इन हाऊस कोट्यात सहज प्रवेश मिळत असताना देखील पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमांकडे वळत आहेत. आज उच्च शिक्षण घेवुनदेखील बेरोजगारीचे प्रमाण वाढते आहे. ठराविक शाखांमधील उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. मात्र उच्च शिक्षित उमेदवारांची प्रचंड संख्या व त्या प्रमाणात रोजगार मात्र उपलब्ध होत नसल्याने व्यावसायिक शिक्षणाच्या वाटा विद्यार्थी चोखळतात. स्वयंरोजगार व स्वव्यवसायाच्या संधी यातून मिळत असल्याने पदवीपर्यंतचे शिक्षण आता ऐच्...