विद्यार्थ्यांनो, जोमाने अभ्यास करा पण तब्येतही सांभाळा !
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परीक्षा ११ फेब्रुवारीपासून आणि एसएससीच्या परीक्षा आजपासून सुरू झालेल्या आहेत. यंदा परीक्षा नियोजित वेळेपेक्षा अगोदर सुरू झालेल्या असून निकालही लवकर जाहीर होणार आहेत. १५ मेपर्यंत बारावी आणि दहावीचा निकाल जाहीर होतील असा अंदाज आहे. राज्यात यंदा बारावी परीक्षेसाठी १५ लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षा देत आहेत ज्यामध्ये कला, वाणिज्य व विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. राज्यात सोळा लाखांहून अधिक विद्यार्थी दहावीची परीक्षा देत आहेत. खरंतर दहावी व बारावीची वर्षे विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील महत्वाची व टर्निंग पॉईंट ठरणारी वर्षे. त्यामुळे पालक, शिक्षक व विद्यार्थी सर्व शक्तीनिशी या परीक्षेची तयारी करण्यात व्यग्र आहेत. अभियांत्रिकी, वैद्यकीय, पदवी यासारख्या शाखांची दारे इथूनच पुढे उघडत असल्याने शैक्षणिक करिअरच्या दृष्टीने मुले अगदी झोकून देऊन अभ्यासात मग्न असल्याचे चित्र पाहायला मिळते. वर्षभर मुले अगदी मन लावून अंतिम परीक्षेची तयारी करत असतात. मात्र वर्षभर तयारी केल्यानंतर ऐन परीक्षेच्या वेळी विद्यार्...