Posts

Showing posts from June, 2023

आषाढीची वारी, आली पंढरीच्या दारी - कविता

Image
आषाढीची वारी, आली पंढरीच्या दारी आषाढीची वारी, आली पंढरीच्या दारी |  पाहता माऊली, सुखावले वारकरी || दिंडी चालतसे वाटेने, ओढ असे ती पंढरी | तृप्त झाले मन, पाय लागे चंद्रभागातिरी || आषाढीचा सण मोठा, चाले संतांच्या संगती | वारीचा देखणा सोहळा, शिण देहाचा हरती || नाही कमी कुठे पडती, सर्व सोयी वारी मिळती |  आजाराला नाही थारा, औषधोपचार जागोजागी || रिंगणाचा तो सोहळा, नाही कुठे दिसे जगी | माझ्या विठुरायाच्या चरणी, सर्व सुखे सदा उभी || चंद्रभागेच्या त्या तीरी, सर्व विघ्ने विसरती | रखुमाईच्या मंदिरी, मन शांत चित्त होई || वारीच्या ऊर्जेने, फिरता जड पावली | पुन्हा धाव घेऊ, मनी ठेवू विठू माऊली || शासनाच्या सोयी भारी, स्वच्छ निरोगी पंढरी |  वारकरी उपचार घेती, महा आरोग्य शिबिरी || पंढरीचा हा सोहळा, आहे जगात वेगळा | एकदा तरी अनुभवा, संत भेटीचा हा मेळा || *वैभव मोहन पाटील*

शिक्षण व अध्यात्माची सांगड

Image
काटी गावात आषाढीनिमित्त विद्यार्थ्यांची दिंडी पालघर जिल्ह्यातील काटी गावातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी काल आषाढी एकादशीनिमित्त गावात पायी दिंडी काढली. शिक्षण व आधुनिकतेच्या जगात अध्यात्माची ही सांगड पालक व ग्रामस्थांना सुखावणारी ठरली. विद्यार्थ्यांच्या दिंडी निमित्त सर्व  गावात आनंदाचे वातावरण दिसून आले. गावातील शाळा 100% प्रगत असून शाळेत सातत्याने विविध नाविन्यपूर्ण उपक्रम आयोजित केले जातात. आषाढी एकादशी निमित्त केंद्र प्रमुख रमेश चव्हाण सर, मुख्याध्यापक जाधव सर यांची संकल्पना आणि प्रविण बडे सर यांच्या निजोजनातून दिंडी पार पडली. गावातून सर्व ग्रामस्थांनी दिलेला उत्स्पूर्त प्रतिसाद उल्लेखनीय होता. गावात ठिकठिकाणी या विद्यार्थी दिंडीचे स्वागत करण्यात आले.  वैभव पाटील 

ही महानगरपालिकेची जबाबदारी

Image
पावसाळ्यात मॅनहोल्समध्ये पडून मृत्यू झाल्याच्या घटना यापूर्वी अनेकदा मुंबई व उपनगरांत घडलेल्या आहेत. मुसळधार पावसात रस्ते व गटारे तुडुंब भरून वाहत असल्याकारणाने उघड्या मॅनहोलचा अंदाज न आल्याने अनेक नागरिक, जनावरे अपघातग्रस्त होतात तर अनेकांचा नाहक जीव जातो. बऱ्याचदा अशा प्रकारच्या मॅनहोल्सवरील झाकणे तुटलेल्या अवस्थेत असतात. अनेक ठिकाणी तर झाकणेच नसतात. दुरुस्तीच्या नावाखाली मॅनहोल्सवरील काढण्यात आलेल्या जाळ्या पुन्हा बसवण्याची तसदी घेतली जात नाही. त्याची योग्य देखभाल दुरुस्ती करणे ही महानगरपालिकेची जबाबदारी आहे. संबंधित प्रभाग कार्यालयाच्या नजरेस अशी ठिकाणी त्वरित यायला हवीत. मात्र पावसाळा सुरू होवुनदेखील या बाबतीत उदासीनता दिसून येत आहे. शहरांतर्गत रस्ते आज चकाचक होत आहेत मात्र उघडी गटारे व मॅनहोलच्या बाबतीत तितकेसे गांभीर्याने घेतले जात नाही. पावसाळ्यात होणाऱ्या अपघातांना रस्त्यांबरोबरच ही उघडी गटारेदेखील जबाबदार आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने मृत्यूचा सापळा बनलेल्या ह्या मॅनहोल्सवर संरक्षक जाळ्या बसवण्याची कामे तातडीने पूर्ण करावीत.  वैभव मोहन पाटील...

जॉयच्या कार्यास समाजाप्रती संवेदनशील व्यक्तींची अमूल्य साथ - वैभव पाटील .... जॉय संस्थेचा शनिवारी जव्हारच्या कर्णबधिर शाळेत उपक्रम

Image
काल आम्ही जव्हार येथील प्रगती प्रतिष्ठानच्या निलेश मुरडेश्वर कर्णबधिर विद्यालयाला भेट दिली. निमित्त होते आमच्या जॉय ऑफ गिव्हिंग या सामाजिक संस्थेमार्फत आयोजित करण्यात आलेला विद्यार्थी भेट उपक्रम. यावेळी विद्यालयातील ६५ विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व दैनंदिन गरजेच्या वस्तूंचे तसेच वसतिगृहासाठी किराणा सामानाचे वाटप करण्यात आले. मुंबईत विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या समाजाप्रती संवेदनशील व्यक्तींच्या सहयोगातून जॉय ऑफ गिव्हिंग या संस्थेची निर्मिती जोगेश्वरी येथील शिक्षक श्री गणेश हिरवे यांच्या संकल्पनेतून करण्यात आली आहे. संस्थेतील सदस्यांना श्री हिरवे यांनी व्हाट्सएपसारख्या सोशल माध्यमाद्वारे एकत्र आणत याच सभासदांच्या सहभागातून मुंबई, ठाणे तसेच पालघर जिल्ह्यातील आदिवासी, गरजू विद्यार्थी, अनाथ मुले तसेच वृद्धाश्रमातील वृद्धांना सातत्याने गरजेच्या वस्तू पोहोचवण्याचे कार्य ते अविरतपणे करत आहेत. कोरोना काळातदेखील अनेक गरजूंना मदत पोहोचवण्याचे कार्य जॉय संस्थेच्या माध्यमातून करण्यात आले आहे. संस्थेच्य...

२१ जून जागतिक योग दिन - "हर आंगण योग"

Image
योगा फॉर वसुधैव कुटुंबकम २१ जून हा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस असून सन २०१५ पासून हा दिवस आंतराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जात आहे. यंदाच्या योग दिनाची टॅग लाईन "हर आंगन योग" अशी असून 'योगा फॉर वसुधैव कुटुंबकम" या संकल्पनेवर यंदाचा ९वा जागतिक योग दिन साजरा केला जात आहे.   आज आपल्या आजूबाजूला विविध आजारांनी, व्याधींनी त्रस्त असणारे रुग्ण आपल्याला पावलोपावली दिसतात. ओसंडून वाहणारी रुग्णालये व दवाखान्यांमधील गर्दी याची साक्ष आपल्याला देतील. पारंपरिक आजारांची व उपचारांची जागा आता संसर्गजन्य व अससंसर्गजन्य आजार अशा नव्या आधुनिक नावांनी घेतली आहे. त्यावरील निरनिराळ्या उपचार पद्धती व शस्त्रक्रिया जर आपण पहिल्या तर त्यासाठीच्या वैद्यकीय खर्चाचे आकडे पाहूनच गरगरायला होते. घर ते कार्यालय यामधील प्रवासात व कामात आपण इतके गुरफटलेले आहोत की मानसिक तणाव व शारीरिक व्याधी आपल्यामध्ये कधी घर करतात हे आपल्याला कळतही नाही. लहान मोठ्या व्याधींसाठी जवळपासच्या किंवा ओळखीच्या डॉक्टरकडे जाऊन जुजबी औषधोपचार करून घेतो व हा औषधोपचार असंख्य वैद्यकीय चाचण्यां...

चाळ धारकांसाठी धोरण असावे

Image
सन २००० ते २०११ या कालावधीतील झोपडपट्टी धारकांसाठी मोफत घर देण्याची योजना सरकारने जाहीर केली. याचा लाभ मुंबईतील झोपडपट्टी भागांत राहणाऱ्या लाखो कुटुंबाना मिळणार आहे. एसआरए म्हणजे झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणांतर्गत हा विकास केला जाणार आहे. १९९५ सालच्या युती सरकारने मुंबईतील जवळपास ४० लाख झोपडपट्टीत राहणाऱ्या कुटुंबाना पक्की घरे मिळावीत या उद्देशाने एसआरए ची निर्मिती केली. आज अशा झोपड्यांची व त्यात राहणाऱ्या लोकांची संख्या खूप मोठी आहे. असे असले तरी झोपडपट्टी धारक हाच घटक केंद्रस्थानी ठेवून आजवर पुनर्विकासाची धोरणे रेखाटण्यात आलेली आहेत. मुंबई व उपनगरांत मोठया संख्येने असलेल्या चाळधारकांच्या बाबतीत मात्र दिलासा देणारे आजवर कुठलेही सरकारी धोरण अस्तित्वात नाही. यामुळे वर्षानुवर्षे बैठया चाळीत राहणाऱ्या लोकांना एकतर स्वखर्चाने आपल्या चाळींचा पुनर्विकास करावा लागत आहे किंवा क्लस्टरसारख्या एखाद्या योजनेच्या प्रतीक्षेत राहावे लागत आहे. वास्तविक हा घटक खऱ्या अर्थाने अल्प व मध्यम वर्गीय मानला जातो. आज सिडको, म्हाडा सारख्या प्राधिकरणाच्या गृहनिर्माण योजनांमध्ये घरे घेणेदेखील या मध्...

रेल्वे प्रवास वेगवान नव्हे तर सुरक्षित करण्याची गरज

Image
आज देशातील बहुतांश जनता स्वस्त व वेगवान प्रवास म्हणून रेल्वे सेवेचा वापर करते. त्यामुळे रेल्वे गाड्यांवर प्रवाशांचा प्रचंड भार आहे हे नाकारून चालणार नाही. अशाही परिस्थितीत रेल्वे सेवा नियमित व वेळेवर चालवण्याची कसरत रेल्वे प्रशासनास करावी लागते. रेल्वेवर पडणारा अतिरिक्त प्रवाशी भार कमी करण्यासाठी अनेक शहरांमध्ये मेट्रो, मोनो रेल सारखे अंतर्गत प्रकल्प राबवले जात आहेत ज्याचा सकारात्मक परिणाम सार्वजनिक वाहतूक व्यवस्थापनावर होताना दिसत आहे. मात्र हे सर्व उपाय करत असताना रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्राधान्याने विचार नक्कीच व्हायला हवा. ओडिशा मध्ये घडलेली दुर्घटना अत्यंत दुर्दैवी असून ती टाळता आली असती. अपघातांमध्ये शेकडोंच्या संख्येने बळी जाण्याच्या घटना यापूर्वीही घडलेल्या आहेत. मात्र तंत्रज्ञान इतके पुढारलेले असताना तांत्रिक बाबींमध्ये दोष निर्माण झाल्याने होणाऱ्या दुर्घटना नक्किच रोखता येतील. यासाठी रेल्वे रूळ व गाड्यांची देखभाल, दुरुस्ती तसेच मोटरमन व रेल्वे यंत्रणा हाताळणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांचे शारीरिक, मानसिक स्वास्थ व प्रशिक्षण या बाबी वेळोवेळी तपासणे क्रमप्राप्त ठ...

स्वावलंबी अगरबत्ती व धूप - ग्रामीण महिलांच्या कौशल्याचा अविष्कार

Image
नैसर्गिक आणि दर्जेदार स्वावलंबी अगरबत्ती  ग्रामीण भागातील स्त्रिया आजदेखील देशाच्या अनेक भागांमध्ये चूल आणि मूल या संकल्पनेत अडकून आहेत. कमी शिक्षण, कौटुंबिक जबाबदाऱ्यांचा ताण, शेतीची कामे आणि पुरुषप्रधान संस्कृती यामुळे ह्या स्त्रियांना म्हणावी तशी मोकळीक मिळत नाही. नोकरी व्यवसाय वगैरे तर फार दुरचीच गोष्ट. समाजातील काही टक्के महिला आज चांगले शिक्षण घेऊन सक्षमपणे उद्योग व्यवसाय व नोकऱ्यांमध्ये स्वतःच्या पायावर यशस्वीरित्या उभ्या राहिल्या आहेत. शहरी भागात निश्चितपणे त्या दृष्टीने आशादायक चित्र आहे. मात्र ग्रामीण भागातील अवस्था महिलांच्या सक्षमीकरणाच्या बाबतीत फार बरी म्हणावी अशी मुळीच नाही. मात्र तरीदेखील आज काही महिला मोठ्या हिंमतीने नोकरी व्यवसायात उतरत आहेत आणि आपल्या बरोबरीच्या स्त्रियांनादेखील आपल्यासोबत अर्थार्जनासाठी प्रवृत्त करताना दिसत आहेत. गावोगावी स्थापन झालेल्या महिला बचत गटांच्या माध्यमातून व्यावसायिक दृष्टिकोन ठेवून गृहोपयोगी वस्तूंची निर्मिती करण्यासाठी अनेक महिला आग्रही आहेत. त्यांना योग्य दिशा व हाताला काम दिले तर त्या घरसंसारात चांगल्या प्र...