मध्यमवर्गीयांचे जीवन किमान सुसह्य असावे
कुठल्याही आंदोलनादरम्यान शासकीय मालमत्तेचे नुकसान व कर्मचा-यांना मारहाण या बाबी समर्थनीय नाहीत. यामध्ये जनतेच्याच कररुपातून भरलेल्या निधीचाच चुराडा होत असतो. मात्र सध्या अशा प्रकारे हिंसक आंदोलन केल्याशिवाय सरकारी यंत्रणा जाग्या होत नाहीत हा समज दृढ होत चालल्यानेच असे प्रकार वारंवार घडत आहेत. सध्या नवी मुंबईसह सर्वत्र उष्णतेने परमोच्च टोक गाठले आहे. अशात तासंतास विज गायब होत असेल व त्यावर तातडीने उपाययोजना होणार नसतील तर नागरिकांच्या संतापाचा कडेलोट होणारच. अनेकांच्या घरात वयोवृध्द, रुग्ण तसेच लहान मुले असतात. प्रचंड उकाडयात विजेविना त्यांना बसणे असहय होऊन जाते. त्यामुळे उन्हाळा, पावसाळा व प्रामुख्याने रात्रीच्या वेळेस विज यंत्रणेत बिघाड झाल्यास त्या तातडीने दुरुस्त करणा-या यंत्रणा वीज महामंडळाने कार्यान्वित करायला हव्यात. उघडयावरील लोंबकळणा-या तारा, नादूरुस्त डिपी बॉक्स यांची दुरुस्ती करण्यासाठी फिरती दुरुस्ती पथके पाठवायला हवीत. बिघाडाच्या बहुतांश घटना अतिभारामुळे घडत असल्याने अधिक क्षमतेची वीजयंत्रे बसवून वीजचोरी रोखायला हवी. वीज कार्याल...