मागच्या आठवड्यात गडकरीला "सफरचंद" हे अत्यंत प्रभावी नाटक पाहण्याचा योग आला. मराठी नाट्यसृष्टीतील अत्यंत कलात्मक असे हे नाट्य पाहताना सिनेमाच्या पडद्यावर नाटक पाहत असल्याचा भास झाला. अत्यंत सहजसूंदर अभिनय, सराईतपणे फिरवला जाणारा रंगमंच, चित्रीकरणाला साजेशे असे संगीत, नेत्रसुखद नेपथ्य, तितकेच प्रभावी प्रकाश संयोजन या वातावरणात नाटकाचे दोन्ही अंक कधी संपले कळालेच नाही. काश्मीर खोऱ्यातील वातावरणाचे दर्शन घडवणारे हे नाटक अनेक प्रसंगांमध्ये अक्षरशः अंगावर शहारे आणणारे आहे. जातीय भिंती बाजूला सारून माणसाला माणूस म्हणून जगायला शिकवणारे हे नाटक आहे. लेखिका स्नेहा देसाई यांच्या लेखणीतून उतरलेलं आणि राजेश जोशी यांचं दिग्दर्शन असलेलं हे नाटक शंतनु मोघे, संजय जामखंडी, प्रमोद शेलार, शर्मिला शिंदें, अमीर तळवडेकर, रूपेश खरे, अक्षय वर्तक, राजआर्यन कासुर्डे या दमदार कलावंतांच्या जबरदस्त अभिनयानं मंत्रमुग्ध करणारं आहे. खुर्चीला खिळवून टाकणारी परिणामकारकता आणि जबरदस्त टीम वर्क यामुळे हे नाटक मी पाहिलेल्या आजवरच्या नाटकांमध्ये एका वेगळ्या धाटणीचे आहे एव्हढे नक्की. वैभव मो...