Posts

Showing posts from May, 2022

देशमुख काका एपीएमसीतुन सेवानिवृत्त

Image
हसतमुख, हसवणारे, मेव्हणे व पाहुण्यांना सांभाळणारे देशमुख काका वाशीच्या मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील अनंत बाळकृष्ण देशमुख (देशमुख काका) हे बाजार समितीतील ३१ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे २०२२ रोजी सेवानिवृत्त झाले. सतत हसतमुख, हसवणारे व मदतीला सदैव धावून येणारे देशमुख काका आमचे अत्यंत जवळचे कौटुंबिक स्नेही. माझे वडील आणि देशमुख काका दोघेही एपीएमसीमध्ये नोकरीला होते. ऐरोलीला शाळेत असताना आम्ही एकाच रो हाऊसमध्ये राहायचो. त्यामुळे वडील शनिवार रविवारी गावी गेल्यावर मी त्यांच्याकडेच असायचो. नेहमी इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करणाऱ्या देशमुख काकांना कधी टेन्शनमध्ये असलेले मी पाहिले नाही. उलट एखाद्या अडचणीच्या प्रसंगी ते धीर देतात, अगदीच मूडमध्ये असतील तर त्यांच्या आवडीचे पोवाडे, गाणी ऐकवतात. कौटुंबिक व आप्तेष्टांमध्येदेखील ते सर्वांना प्रिय आहेत. प्रत्येक कौटुंबिक कार्यक्रमामध्ये आवर्जून हजेरी लावणारे काका त्या कार्यक्रमाचा भाग कधी होऊन जातात कळतही नाही. अगदी घरातलाच कार्यक्रम असल्यासारखे ते प्रत्येक कामात हातभार लावत असतात. ऐरोलीनंतर घणसोलीला राहायला आल्यावरही आम्ही...

पर्यावरण संतुलन महत्वाचे

Image
जागतिक पर्यावरण दिनाच्‍या निमित्‍ताने निरोगी आयुष्‍यासाठी पर्यावरण संतूलन महत्‍वाचे यंदाच्‍या मे महिन्‍यात कधी नव्‍हे इतकी उष्णतेची लाट सर्वत्र पसरली. निसर्गाची अपरिमित व न भरून येणारी हानी, वृक्षतोड, शहरे व ग्रामीण भागांचे आसुरी काँक्रीटीकरण, नष्ट होत चाललेले जलसाठे व ग्लोबल वॉर्मिंगचा परिणाम ही कारणे वाढलेल्या उष्णतेला देता येतील. अनियमित ऋतूचक्र व लुप्त होत चाललेला निसर्ग यामुळे वातावरणात झपाट्याने बदल घडत असून त्याचा विपरीत परिणाम मानवी जनजीवनावर तसेच आरोग्यावर होताना दिसत आहे. राज्यात वाढलेली गर्मी आज आबालवृद्ध, महिला, प्राणी, पक्षी या सर्वच घटकांना त्रासदायक ठरत असून त्यावर मात करण्यासाठी पर्यावरण संतुलन राखण्याचे मोठे आव्हान आज आपणा सर्वांसमोर आहे. सध्या सर्वत्र पसरलेला वाहनांचा भस्मासुर व त्यामुळे होत असलेले प्रदूषण याचा विचार केला तर या वाहनांवर कुठेतरी नियंत्रण आणले पाहिजे असे आपणा सर्वांनाच वाटत असते. मात्र त्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्‍न केले पाहिजेत. रस्त्यावरील वाहतूक कोंडी, त्यात इंधनाचा अपव्यय, त्‍यातून होणारे प्रदूषण व त्यामुळे धोक्यात आलेले लोकांचे आरोग्...

हसतमुख संयमी व हरहुन्नरी अधिकारी डॉ संजय जयस्वाल सेवानिवृत्त

Image
*नागपूर आरोग्य उपसंचालक डॉ जयस्वाल सर देखील निवृत्त* डॉ संजीव जयस्वाल हे आरोग्य विभागातील जेष्ठ व अनुभवी अधिकारी आज उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर पदावरून सेवानिवृत्त होत आहेत. विभागातील सर्वांचे लाडके, हरहुन्नरी व सदा हसतमुख अधिकारी म्हणून डॉ जयस्वाल सरांचा मी उल्लेख करीन. विदर्भातील आरोग्य सेवा सक्षम व सर्वसमावेशक करण्यात त्यांचे मोठे योगदान आहे. आरोग्य विभागातील आपली प्रदीर्घ सेवा त्यांनी विदर्भातच केली. उच्चविद्याविभूषित असलेल्या जयस्वाल सरांनी वैद्यकीय क्षेत्रातील अनेक पदव्या धारण केल्या आहेत. त्यांचे उत्तम नेतृत्व, नियोजन कौशल्य व शांत संयमी स्वभाव यामुळे विदर्भाची जबाबदारी त्यांनी गेली अनेक वर्षे लीलया पेलली. अगदी पूर्वी विधिमंडळाच्या नागपूर हिवाळी अधिवेशनात मुंबईतील अधिकारी कर्मचाऱ्यांची बैठक व्यवस्था, निवास व्यवस्था ते अधिवेशनाचे कामकाज, ते सर्व नियमित जबाबदाऱ्या सांभाळून पार पाडायचे. त्यांच्या काटेकोर नियोजनामुळे कुठली उणीव वरिष्ठांना भासली नाही. असे सदाबहार व नवचैतन्याची खाण असलेले डॉ जयस्वाल सर निवृत्त होताहेत असे वाटतच नाही. निवृत्तीनंतरही ...

डॉ उल्हास मारुळकर यांची सेवानिवृत्ती

Image
आरोग्य सेवेतील अभ्यासू आणि जिज्ञासू व्यक्तिमत्व आरोग्य विभागातील आणखी एक अधिकारी आज नियत वयोमानाने सेवानिवृत्त होत आहेत. आरोग्य सेवेत तब्बल ३६ वर्षांची प्रदीर्घ सेवा बजावून आरोग्य उपसंचालक डॉ उल्हास मारुळकर यांनी सेवेतून एक्झिट घेतली. आपल्या संपूर्ण सेवाकालावधीत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये व राज्यस्तरीय विषयांमध्ये काम करणारे डॉ मारुळकर अत्यंत अभ्यासू, कर्तव्यनिष्ठ व संयमी अधिकारी म्हणून परिचित आहेत. सध्या राज्यस्तरावरील रुग्णालये कक्षाचा कार्यभार त्यांच्याकडे होता. विभागातील मोठया प्रमाणावरील रिक्त पदांमुळे कनिष्ठ अधिकाऱ्यांवर अनेक विषयांची जबाबदारी आहे. मात्र डॉ मारुळकर यांनी आपल्यावर सोपवलेली कामगिरी कुठलीही उणीव जाणवू न देता यथायोग्य बजावली. मग ते महाराष्ट्र वैद्यकीय सेवा हिंसक कृत्ये व मालमत्तेची हानी अथवा नुकसान प्रतिबंध अधिनियम, २०१० मध्ये सुधारणा करण्यासाठीचा मसुदा तयार करण्यातील योगदान असो की वैद्यकीय देयकांची प्रतिपूर्ती किंवा अलीकडेच संरक्षण खात्याच्या आरोग्य संस्था विभागाकडे हस्तांतरित करण्याचा विषय असो प्रत्येक कामात त्यांनी दाखवलेली तत्परता लक्षा...

आरोग्य सेवेचा ध्यास घेतलेली अनोखी व्यक्तिमत्वे

Image
डॉ सतीश पवार सर व डॉ अर्चना पाटील मॅडम यांची सेवानिवृत्ती  आरोग्य सेवेतील अनेक अधिकाऱ्यांची सेवानिवृत्ती आजवर पाहिली. मात्र आज ज्या अधिकाऱ्यांना नियत वयोमानानुसार आरोग्य विभाग निरोप देतोय तो निरोप नक्कीच मनाची घालमेल वाढवणारा आहे. राज्याच्या आरोग्य सेवेचा मजबूत कणा म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जाते ते माजी आरोग्य संचालक व अतिरिक्त अभियान संचालक डॉ सतीश पवार सर तसेच आरोग्य संचालिका डॉ अर्चना पाटील मॅडम यांची सेवानिवृत्ती विभागात नक्कीच एक उणीव निर्माण करणारी आहे. विभागाचे कुठलेही विषय, उपक्रम, योजना व धोरणात्मक निर्णय या अधिकाऱ्यांशिवाय पूर्णत्वास गेले नाहीत असे कुशल, खंबीर नेतृत्वकौशल्य धारण केलेले हे दोन्ही अधिकारी. आरोग्य सेवेला वाहून घेतलेल्या व विभागासाठी अक्षरशः झपाटल्यागत काम करणाऱ्या ह्या दोन्ही अधिकाऱ्यांनी कामकाजाच्या आढाव्यासाठी अख्खा महाराष्ट्र न जाणे किती वेळा पिंजून काढला असणार! आरोग्य व्यवस्थेची अगदी खडा न खडा माहिती असल्यामुळे त्यांच्या कामकाजात कमालीची सहजता दिसून येते. कुठल्याही किचकट, क्लिष्ट व अडचणीच्या विषयात सुकर मार्ग काढण्यात त्यांचा हातखंडा. कुठल्य...

गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी मालिका

Image
देवमाणूस ही झी मराठीवरील मालिका विकृती व गुन्हेगारीला प्रोत्साहन देणारी आहे. मालिकेच्या पहिल्या सीझनमध्ये डझनभर खून करूनदेखील सहीसलामत सुटलेला डॉ अजित कुमार उर्फ देवी सिंग हा नटवर बनून त्याच गावात परततो व पुन्हा लोकांची उघड लूट व खुनांची मालिका सुरू करतो हे न पटण्यासारखे आहे. पोलिसांना देखील हातोहात चकवणाऱ्या अजितची भूमिका चीड आणणारी आहे. दुसऱ्या सीझनमध्ये दोन महिला व एक लहान मुलीची हत्या करून गावकऱ्यांचे लाखो रुपये लाटण्यात तो यशस्वी झालेला आहे. तरीदेखील पोलिसांच्या हातात कुठलाही पुरावा लागत नाही ही अतिशयोक्ती असून पोलिसांच्या कामगीरीवर प्रश्नचिन्ह उभे करणारी बाब आहे. अजितवर प्रचंड अंधविश्वास असणारे बज्या व नाम्या तसेच त्याला प्रत्येक गुन्ह्यात साथ देणारी डिंपल ह्यांच्या भूमिकादेखील न पटणाऱ्या आहेत. अंध असणाऱ्या सरुआजीला व चिमुरड्या मुलीला अजितमधील राक्षस दिसतो मात्र इतरांना तो दिसत नाही हे अनाकलनीय आहे. यातून मालिकेच्या प्रेक्षकांना नक्की कोणता संदेश द्यायचा आहे? वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

बेवारस वाहनांवर कारवाई व्हावी

Image
वाढत्या वाहनांमुळे नवी मुंबईमधील पार्किंगचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. रस्त्याच्या दुतर्फा पार्क केलेल्या वाहनांनी निम्म्याहून अधिक रस्ता व्यापला जात आहे व रहदारीस त्याचा मोठा अडथळा निर्माण होत आहे. नवी मुंबईतील सर्वच रस्त्यांची अवस्था अशीच असून या बेकायदा पार्किंग केलेल्या वाहनांवर कारवाई करण्याची गरज प्रकर्षाने निर्माण झाली आहे. रहिवाशी संकुलांमध्येदेखील इमारतींसमोरील रस्त्यांवर ही वाहने सर्रास उभी केली जातात. एकही असा रस्ता सापडत नाही जिथे अनधिकृतपणे उभी असणारी वाहने नाहीत. यामुळे बऱ्याचदा इमारतींमधून वाहने बाहेर काढताना, अरुंद रस्त्यांवर दोन चारचाकी वाहने पास होण्यास अडथळा निर्माण होतो. अनेक वाहने तर महिनोंमहिने रस्त्याच्या कडेला उभी केलेली दिसतात. नागरी स्वच्छता व सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनदेखील ही वाहने अत्यंत धोकादायक असल्यामुळे वेळीच अशा बेवारस वाहनांच्या मालकांचा शोध घेणे किंवा ती जप्त करणे क्रमप्राप्त ठरते. या वाहनांचा वाली कोण असा प्रश्नही अनेकदा पडतो. भर रस्त्यात उभी करण्यात येणारी ही वाहने रहदारीसाठी मोठा अडथळा ठरत असल्याने त्यांच्यावर नियमितपणे कारवाई करणारी य...

प्रसाधनगृहे सोयीस्कर हवीत

Image
ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावरील कुठल्याही स्थानकातील फलाटावर प्रसाधन गृह नाही. यामुळे प्रवाशांची विशेषतः लहान मुले, वृद्ध व महिलांची मोठी कुचंबणा होत आहे. प्रसाधन गृह गाठण्यासाठी थेट रेल्वे स्टेशनबाहेर जावे लागते. ही प्रसाधनगृहे रेल्वे स्थानकात एका कोपऱ्यात बनवण्यात आली आहेत जी शोधण्यासाठीदेखील मोठी तारेवरची कसरत करावी लागते. ही प्रसाधनगृहे खरेतर तर रेल्वे स्थानकातील फलाटावर असायला हवीत जेणेकरून प्रवाशांच्या सहज दृष्टीपथात पडतील व त्यांच्या कामी येतील. या मार्गावरील सर्व रेल्वे स्थानके सुंदर, स्वच्छ, प्रशस्त व अवाढव्य असून सदर स्थानकातील प्रसाधनगृहांची ही रचना मात्र खटकते. याचा रेल्वे प्रशासनाने गांभीर्याने विचार करावा व प्रसाधनगृहे लोकांना सोयीस्कर होतील अशा ठिकाणी फलाटावर तयार करावीत.  वैभव मोहन पाटील  घणसोली, नवी मुंबई 

वर्षाखेरीस निवडणुका घेणे उचित

Image
ओबीसी आरक्षणावरुन राज्‍यात गदारोळ सुरु असताना सर्वोच्‍च न्‍यायालयाने निवडणूक आयोगाला दोन आठवडयांत स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर करण्‍याचे आदेश दिले आहेत. गेल्‍या दोन वर्षांपासुन कोरोना प्रादुर्भावामुळे मुदत संपलेल्‍या स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांच्‍या निवडणूका वारंवार पुढे ढकलण्‍यात येत आहेत. त्‍यामुळे कोरोनाची संभाव्‍य साथ, प्रभाग आरक्षणाचा घोळ व येत्‍या पावसाळयाच्‍या पार्श्‍वभुमीवर १५ दिवसांमध्‍ये निवडणूका जाहिर करुनही त्‍या प्रत्‍यक्षात होतील की नाही याबाबत साशंकताच आहे. प्रशासकांच्‍या राजवटीखाली सुरु असलेला कारभार आणखी काही काळ सुरु ठेवून या वर्षाअखेरीस निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे उचित ठरेल. तोवर ओबीसी आरक्षणाचा मुददादेखील निकाली निघेल.   वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई

वाहनविक्रीवर नियंत्रण हवे

Image
मुंबईतील वाहन संख्येवर कुणाचेही नियंत्रण नाही. शहरात रोज किती वाहने येतात व जातात याची मोजदाद करणारी यंत्रणाच नाही. त्यामुळे भरमसाठ संख्येने वाहने रोज रस्त्यांवर धावत आहेत. सर्वत्र करण्यात येत असलेली रस्त्यांची कामे, महिनोंमहिने सुरू असलेली मेट्रोची कामे व त्यात रस्त्याच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग केलेली वाहने यामुळे सकाळ व सायंकाळच्या वेळेत मुंबईतील रस्ते वाहनांच्या रांगांनी व्यापून गेलेले असतात. प्रचंड संख्येने वाहने रस्त्यावर उतरत असल्याने सर्वत्र वाहतूक कोंडी आजकाल नित्याचीच झाली आहे. टोल नाक्यांवर तर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या दिसतात. दररोजची ही वाहतूक कोंडी लोकांचा वेळ, इंधन व पैसा यांचा अपव्यय करणारी ठरत आहे. यातून वाहनांचे छोटेमोठे अपघात आलेच. मुंबईत वाहन विक्रीवर अजिबात नियंत्रण नाही. त्यामुळे दररोज हजारोंच्या संख्येत नवी वाहने नोंदणी होऊन रस्त्यावर येत आहेत. ही संख्या दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे वाहतूक नियोजनाचे तीनतेरा वाजले आहेत. त्यामुळे मुंबईसारख्या दाटीवाटीच्या शहरात वाहनविक्रीवर कुठेतरी निर्बंध आणण्याची गरज निर्माण झाली आहे. दररोजच्या वाहतूक कोंड...

हार्बर वरील एसी लोकल बंद करणे हितावह

Image
एसी लोकल तिकिटाचे दर कमी केल्याने मध्य रेल्वे मार्गावरील वातानुकूलित लोकलमध्ये प्रवास करणाऱ्या प्रवाशी संख्येत ६० टक्क्यांनी वाढ झाली आहे. एकीकडे मध्य मार्गावर एसी लोकलला प्रवाशांचा प्रतिसाद वाढत असताना दुसरीकडे हार्बर मार्गावर मात्र अल्प प्रतिसाद आहे. मे च्या पहिल्या आठवड्यात एसी लोकलने प्रवास केलेल्या एकूण २८ हजार प्रवाशांपैकी २५ हजार प्रवाशी एकट्या मध्य मार्गावरील आहेत तर हार्बर मार्गावर केवळ ३ हजार प्रवाशांनी आठवडाभरात एसी लोकलमधून प्रवास केला आहे. त्यामुळे हार्बर मार्गावर एसी लोकल फार प्रभावी ठरलेल्या नाहीत हे स्पष्ट होत आहे. उलट एसी लोकल फलाटावर लागल्यावर प्रवाशी या गाडीत चढत नसल्याने स्थानकातील प्रवाशी संख्या वाढत जाते व त्याचा भार येणाऱ्या पुढील लोकलवर पडताना दिसत आहे. याच कारणास्तव ट्रान्स हार्बर मार्गावरील एसी लोकल्स यापूर्वीच पूर्णतः बंद करण्यात आल्या आहेत. हार्बर मार्गावरील देखील एसी लोकलच्या फेऱ्या कमी करण्यात आलेल्या असल्या तरी प्रवाशांचा ओढा या गाड्यांकडे अत्यंत कमी असल्याने एसी लोकलचा थाट या मार्गावर पूर्णतः बंद करणेच हितावह आहे. प्रवाशांच्या दृष...

आजूबाजुला घडणाऱ्या घटनांवर बारीक लक्ष ठेवणे गरजेचे

Image
नवी मुंबई, पनवेल हा परिसर अत्यंत झपाट्याने विकसित होत असलेला परिसर आहे. गेल्या काही वर्षांत येथील लोकसंख्या वाऱ्याच्या वेगाने वाढली. मुंबईला पर्याय म्हणून उभ्या राहत असलेल्या या तिसऱ्या मुंबईकडे आज सर्वात सुंदर, नियोजनबद्ध, सोयीस्कर व सुरक्षित शहर म्हणून लोकांचा वास्तव्यासाठी वाढता कल आहे. वाढत चाललेल्या शहराला सोयी सुविधा पुरवण्यासाठी दोन मोठ्या महानगरपालिका येथे कार्यरत आहेत. मात्र भविष्यात या परिसराची व्याप्ती आणखी वाढणार आहे. गेल्या काही वर्षांत अतिरेकी व गुन्हेगारी कारवायांचे अनेक धागेदोरे याच परिसरात सापडले होते हे विसरून चालणार नाही. त्यामुळे सुरक्षा यंत्रणांचे जाळे अधिक घट्ट करावे लागणार आहे. नवी मुंबईसह पनवेलच्या प्रत्येक नोडमध्ये आवश्यक मनुष्यबळासह पोलीस स्थानकांची निर्मिती, सिसिटीव्हीचे विस्तारित जाळे, महत्वाच्या व संवेदशील भागांमध्ये वाढती गस्त तसेच गुन्हेगारी स्वरूपाच्या कारवायांवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी निवासी व एमआयडीसी भागांमध्ये विशेष सुरक्षा उभारावी लागेल. यासाठी महानगरपालिकेमार्फतदेखील खाजगी सुरक्षा व देखरेख यंत्रणा नेमण्याचा पर्याय पडताळून पाहायला हरक...

देवघर येथे निवासी बाल संस्कार शिबिर संपन्न

Image
ऑनलाईन बालसंस्कार स्पर्धा व आनंदवारी प्रश्नमंजुषेचा बक्षीस वितरण समारंभही संपन्न पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील देवघर येथे बाल संस्कार ग्रुप, वारकरी शिक्षण संस्था व देवघर विभाग शिक्षण प्रसारक ट्रस्टच्या वतीने ह.भ.प. पांडुरंग भोईर महाराज यांच्या पुढाकारातून लहान मुलांसाठी दि. १ मे ते १५ मे असे १५ दिवस बालसंस्कार निवासी शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरामध्ये मुलांना व मुलींना वादन , गायन , खेळ , योगा  व अन्य कलांचे  प्रशिक्षण देण्यात आले. या शिबिराचा समारोप रविवार दिनांक १५ मे २०२२ रोजी सकाळी १० वाजता विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. प्रमुख अतिथी म्हणून शिवक्रांती सामाजिक संघटनेचे अध्यक्ष पत्रकार शरद पाटील, सामाजिक कार्यकर्ते व्ही जी पाटील, वृत्तपत्रलेखक वैभव मोहन पाटील, सामाजिक कार्यकर्ते सचिन पाटील , विनोद पाटील ,  कमलाकर पाटील , दिनेश भोईर , योगेश पाटील, संदीप पाटील, सचिन सावंत, अंजली पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी पत्रकार शरद पाटील यांनी विद्यार्थी व पालकांना मार्गदर्शन केले. पूर्वी आई-वडील शिकलेले नसायचे त्या...

राजद्रोहाच्या कलमाचा गैरवापर होण्याची शक्यता

Image
राणा दाम्पत्यावरील खटल्यासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या राजद्रोहाच्या कलमाबाबत सर्वोच्च न्यायालयाने ह्या कलमाला तूर्तास स्थगिती देण्याचा ऐतिहासिक निर्वाळा दिला आहे. त्यामुळे आता नव्याने कोणावरही राजद्रोहाच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करता येणार नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या या आदेशामुळे केंद्र आणि राज्य सरकारला राजद्रोहाच्या १२४ अ या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यास मज्जाव असेल. राजद्रोहाचा कायदा हा जवळपास १५० वर्ष जुना आहे. पूर्वी राजदरबारामध्ये राज्यविरोधी भूमिका किंवा कृती केल्यास हे कलम लावून शिक्षा केली जायची. मात्र, गेल्या काही दिवसांत राजद्रोहाच्या कायद्याचा दुरुपयोग केला जात असल्याची चर्चा सुरू झाली. राजद्रोह कायद्यातील आयपीसी अंतर्गत १२४ कलमावर १०हून अधिक याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायलयात आव्हान दिलं होतं. याचिकाकर्त्यांनी राजद्रोह कायदा अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचे उल्लंघन करत असल्याचं म्हणणे मांडत हे कलम रद्द करण्याची मागणी केली जात होती. त्याला आता काही अंशी यश आले आहे असेच म्हणावे लागेल. वास्तविक राजद्रोह हा गुन्हा आता हद्दपार झाला आहे....

महागाईवर नियंत्रण हवे

Image
देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसह इंधन, गॅस, साबण, तेल, इलेक्ट्रिक वस्तू, गृहखरेदी, विविध सरकारी कर महागल्याने सर्वसामान्य व हातावर पोट असणाऱ्या लोकांचे बजेट पुरते कोलमडले आहे. येत्या काही दिवसांत बेकरी उत्पादनेदेखील महाग होणार आहेत. त्यामुळे गरिबांनी खावे काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. सरकारी कर व इंधन महागल्याने ही भाववाढ केली जात आहे. वास्तविक जीवनावश्यक वस्तूंवरील कर कमी करून सरकारने लोकांना दिलासा द्यायला हवा. करवाढ करण्यासाठी इतर अनेक मार्ग असताना सर्वसामान्यांच्या रोजच्या वापरातील वस्तूंवरील ही दरवाढ संताप आणणारी आहे. विदेशी वस्तू, मद्य, भांडवलदारांवर करवाढ करून सरकारची तिजोरी भरता येऊ शकते. तसेच सरकारी तिजोरीवरील अनावश्यक अर्थभार कमी करण्यासाठी देखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. मोठमोठ्या प्रकल्पांसाठी कर्जे घेऊन कर्जाचा डोंगर उभा करणे योग्य नाही. कोरोनाने मंदावलेली देशाची अर्थव्यवस्था रुळावर येईपर्यंत सरकारी खर्चातून नवे प्रकल्प न राबवता केवळ अत्यावश्यक सेवांवर खर्च करण्यात यावा. सातत्याने करवाढ करून लोकांना महागाईच्या खाईत ढकलणे योग्य नाही...