वाढती वाहन विक्री रोखायला हवी
वाढती वाहनसंख्या आज सर्वच शहरांची डोकेदुखी झाली आहे. रस्त्यावरील रहदारीची समस्या, प्रदूषण, पार्किंगची समस्या यामुळे कुठलेही शहर आज सुसह्य जीवनासाठी अनुकूल राहिलेले नाही. पुण्यासारख्या शहरात गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर एका दिवसात सात हजारांच्या वर वाहने खरेदी होत असतील तर वाहनांचा हा कर्दनकाळ किती मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर उतरतो आहे हे ध्यानात येईल. यात साडेचार हजार दुचाकींचा समावेश आहे. गेल्या वर्षीदेखील ही संख्या साडेसात हजारांच्या घरात होती. मुंबई, ठाणे, नवी मुंबईसारख्या शहरांची अवस्थादेखील यापेक्षा वेगळी नाही. दररोज हजारोंच्या संख्येत नवी वाहने या शहरांमध्ये नोंदणी होत आहेत. वाहनांचा फोफावत चाललेला हा भस्मासुर शहरे गिळंकृत करू लागला तर नवल वाटायला नको ! त्यामुळे वाहनविक्रीवर नियंत्रण आणण्याची नितांत गरज आज निर्माण झाली आहे.

Comments
Post a Comment