आरोग्यमंथन ८१ वे - मानसिक आजारांवर करा मात

मानसिक आजारांवर करा मात

आपणा प्रत्‍येकाला कुठल्‍या न कुठल्‍या प्रकारच्‍या व्‍याधी असतात. काही शारीरीक तर काही मानसिक. शारिरीक व्‍याधींवर वैदयकीय उपचारांनी आपणाला काही कालावधीत मात करता येते. ज्‍यातून लवकर बरे होता येते. मात्र मानसिक व्‍याधींचे समाधान तितक्‍या प्रभावीपणे करता येत नसल्‍याने त्‍या जटील बनत जातात. मानसशास्‍त्रीय कारणांचा अभ्‍यास केला असता हया आजाराने त्रस्‍त व्‍यक्‍तींना यातून बाहेर काढण्‍यासाठी काही उपाय सुचविले जातात ज्‍याचे काटेकोर पालन केले तर रुग्‍ण या आजारातुन बरा होऊ शकतो. शारिरीक विकार दृश्य स्वरुपात असतात परंतु मानसिक विकार वैयक्तिक स्‍वरुपात असल्यामुळे तात्काळ दिसून येत नाहीत. जागतिक पातळीवर समाजात शंभरात एकजण तरी कोणत्या ना कोणत्यातरी गंभीर आजाराने बाधीत असतो व सुमारे 10 ते 12 टक्के माणसं कमी तिव्रतेच्या मानसिक आजारांनी पछाडलेली असतात. महाराष्ट्र राज्यात लोकसंख्येचा जर विचार केला तर सुमारे 8 ते 10 लाख मानसिक आजाराने ञस्त आहेत. म्हणजेच राज्यात मानसिक आरोग्य समस्या निर्माण झाली आहे असे म्‍हटल्‍यास ते वावगे ठरणार नाही. मानसिक आजाराच्या समस्यांचे गांभिर्य आणि व्याप्ती विचारात घेता केंद्र शासनाने 1982 सालापासुन राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम सुरु केला. सदर कार्यक्रम अंमलबजावणी महाराष्ट्रात सुध्दा चालू आहे. सदर कार्यक्रमाचा लाभ राज्‍याच्‍या कानाकोप-यातील जनतेपर्यंत पोहोचावा यासाठी राज्याच्या आरोग्य संचालनालयात विशेष मानसिक आरोग्यकक्ष स्थापन करण्यात आला आहे. राज्यातील दुर्गम आणि ग्रामीण जनतेसाठी मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करुन देणे हेच या कार्यक्रमाचे मुख्‍य उदिदरष्‍ट आहे. मानसिक आरोग्य सेवा या सामान्यतः आरोग्य सेवा सुविधांचा अविभाज्य भाग मानुन सदर कार्यक्रम राबविण्‍यात येत आहे. विविध सामाजिक विकास कार्यक्रमामध्ये मानसिक आरोग्य, जागृकता व सोयी सुविधा यांची माहिती जात असुन मानसिक आरोग्य सेवा विकास व अंमलबजावणी यामध्ये जनतेला समाविष्ट करुन घेणे हादेखील यामागचा उददेश आहे. यासाठी राज्‍यामध्‍ये शासकीय प्रादेशिक मनोरुग्‍णालये स्‍थापन करण्‍यात आलेली आहेत. रुग्‍णालयांत रुग्ण भरती झाल्यानंतर मानसिक आरोग्य कायद्याअंतर्गत तपासणी, मनोविकार तज्ञ परिचारिका यांच्या कडून मानसिक विकारांची नोंद, वैद्यकीय अधिका-यामार्फत शारिरीक तपासणी व शेवटी मानसोपचार तज्ञाकडून संपूर्ण तपासणी व नंतर उपचार सुरु करण्‍यात येतात. राज्‍यातील सर्व चार प्रादेशिक मनोरुग्णालये ही फार जुन्या काळातील असल्यामुळे या रुग्‍णालयांमधील रुग्णासेवा व विविध  सुविधा यांमध्ये सुधारणा करण्यासाठी भर दिला जात आहे. प्रादेशिक मनोरुग्णालयामधील आहार व्यवस्थेवर विशेष लक्ष देवून स्वयंपाकगृहाचे आधुनिकीकरण करण्यात येत आहे. तसेच रुग्‍णांना सकस अन्न व त्याचे सुनियोजित वाटप यामध्येही विशेष लक्ष्य देण्यात येते. रुग्‍णालयात रुग्णांना ताट, ग्लास, बाऊल (चहासाठी) इ. वापरले जातात. बसण्यास बैठक आसनाची व्यवस्था करण्यात येते. बहुतेक सर्व धार्मिक व राष्ट्रीय सणांना सामाजिक संस्थांच्या मदतीने गोडधोड जेवण दिले जाते. रुग्णांना आंघोळीसाठी सोलर एनर्जीवर चालणारे यंञामधून गरम पाणी दिले जाते. प्रती रुग्ण, स्वच्छ कपडे, टॉवेल दिला जातेा. केसांचे तेल, साबण टूथ पावडर, कंगवा इ. सुविधा पुरविल्या जातात. थंडीसाठी ब्लॅकेट, जॅकेट इ. गरम कपडे पुरविले जातात. प्रती रुग्ण 5 कपडयांचा जोड दिला जातो. रुग्णात सुधारणा दिसू लागताच त्याला व्यावसायोपचार विभागामार्फत त्याला तज्ञाच्याच मार्गदर्शनाखाली त्याच्या कलेनुसार शिवणकाम, भरतकाम, शेती, बागकाम, हस्तकला, योगा, संगीत, नृत्य इ. मध्ये गुंतविले जाते. यातील काही वस्तू उदाहरणार्थ रुग्‍णांनी तयार केलेला भाजीपाला, रुग्णालयातच भाजीसाठी वापरल्या जातात. हस्तकलेतून बनवलेल्या वस्तु विक्रीसाठी ठेवल्या जातात. सामाजिक संस्थांच्या मदतीने जॉब प्लेसमेंट साठी प्रयत्न केले जातात. दीर्घ मुदतीच्या आजाराने अनेक रुग्ण प्रादेशिक मनोरुग्णालयामध्ये भरती होत असतात. अशा रुग्णांना त्याचे आत्मबल वाढवून समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये स्वतःच्या हिम्मतीवर उभे राहण्याच्या दृष्टीने व्यवसाय उपचार विभाग व डे केअर सेंटर यांचे माध्यमातून विविध व्यवसाय कौशल्य शिकविले जातात आणि त्यानंतर विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून त्यांना रोजगार उपलब्ध करुन दिला जातो. मानसिक आरोग्य कायदा 1987 नुसार खाजगी मानसिक रुग्णालयांना पंजीकृत करणे बंधनकारक असून त्‍यांना शासनाकडून परवाना पञ दिले जाते. मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सदर रुग्णालयांची मासिक तपासणी होणे बंधनकारक असल्यामुळे प्रादेशिक मनोरुग्णालय पातळीवर उपसंचालक, आरोग्य सेवा, वैदयकीय अधिक्षक, मनोरुग्णालय (शासकीय), कार्यकारी अभियंता (परिमंडळ), मानसिक सामाजिक कार्यकर्ता (अशासकीय), मनोविकार तज्ञ (अशासकीय), चिकित्सालयीन मानसोपचार तज्ञ (अशासकीय) यांचा समावेश अभ्यागत समिती स्थापन करण्यात आलेली आहे. 
वास्‍ताविकतः मानसिक आजाराकडे म्‍हणावे तितके लक्ष दिले जात नसल्यामुळे आजार बळावतो.  अशा रुग्णाकडे नातेवाईकदेखील लक्ष देत नसल्‍यामुळे हे रुग्‍ण मोकाट फिरताना दिसतात. ही माणसे काहीही खातात, पितात, बडबड करतात. त्यांच्यावर वेळेवर उपचार झाले तर ते नक्कीच बरे होतात. यासाठी नातेवाईक आणि सामाजिक संस्थांनी प्रयत्न करायला हवेत. मानसिक आजार असलेला रुग्ण हा मनोरुग्ण असतोच असे नाही. त्याच्यावर नियमित उपचार आणि नातेवाईकांचे प्रेम मिळाले  तर मानसिक आजार हा नक्कीच बरा होतो. त्यामुळे अशा मनोरुग्णांचे पुनर्वसन व्हायला हवे. शासनाच्‍या विविध योजनांमुळे शासकीय रुग्णालयांत मनोरुग्‍णांना उपचार मिळत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांचा आर्थिक खर्चदेखील कमी होण्यास मदत झाली आहे. मात्र याचा लाभ रुग्णाला करून देण्याची जबाबदारी नातेवाईकांची आहे. या रुग्‍णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनस्तरावर व्‍यापक प्रयत्न करण्यात येत असुन त्‍यासाठी समाजातील विविध घटकांची साथ खूप मोलाची ठरेल. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त