लग्न, रिसेप्शन, यजमान आणि वऱ्हाडी

लग्नसमारंभ आणि स्वागतसोहळे





सध्या लग्नसराई अगदी जोमात सुरू आहे. एकाच दिवशी जवळच्या नातलगांचीच एकापेक्षा अधिक लग्न होत असल्याचादेखील अनेकांचा अनुभव आहे. म्हणून त्यातल्याच खूपच जवळच्या नातेवाईकाची निवड उपस्थितीसाठी केली जाते आणि इतर ठिकाणी मानपान आहेर हस्ते परहस्ते पाठवण्याचे सोपस्कार पार पाडले जातात. लग्न ही खरंतर टाळता येण्यासारखी गोष्ट नाही कारण लग्नकार्याप्रसंगी आपण वधू वराला किंवा यजमानाला येऊ शकत नसल्याबद्दल सॉरी बोलून ' पुढल्या वेळी नक्की येईन' असे म्हणू शकत नाही. त्यामुळे लग्नसमारंभप्रसंगी उपस्थित राहणे ही अनिवार्य बाब झाली आहे. आजकाल तर आमंत्रणे देखील अगदी विविध मार्गाने केली जात असल्याने कुणी नातेवाईक अमंत्रणाविना सुटून गेला असं होतं नाही. लग्न पत्रिका ह्या हस्ते परहस्ते, सोशल मिडियावरही पाठवल्या जातात तर फोनवरही आमंत्रणे दिली जातात. उन्हाने अगदी उच्चांकी पारा गाठला असला तरी त्याला लग्नकार्य रोखता येणे शक्य झालेले नाही. शेवटी ऊन हे काही नैसर्गिक आपत्ती किंवा संकट नाही, नाही का ! त्यामुळे उन्हामुळे लग्नकार्य पुढे ढकलले किंवा रद्द केले असे ऐकिवात नाही. त्यामुळे वाढत्या पाऱ्यामध्येही लग्नांचा उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. त्यातच आजकाल एसी लग्नहॉल, कुलर, पंख्याची पसरण अशा गोष्टी उपलब्ध असल्याने त्याने उन्हाची काहिली काही अंशी कमी करता येते. लग्नांची वेळ म्हणजे मुहूर्त साधारणतः अकरा वाजलेपासून ते साडेबारा पावणेएक वाजेपर्यंत असतो मात्र लग्न लागल्यानंतर जे विधी चालतात त्यांचा वेळ फार विस्तारत जातो. अगदीच दोन अडीच पर्यंत हे विधी चालतात तोवर वऱ्हाडी मंडळींची जेवणे वगैरे उरकून घेतली जातात. आणि मग लग्नाच्या स्वागतसमारंभ म्हणजे रिसेप्शनला सुरुवात होते ज्यात नातलग अगदी मुलाबाळांसह भल्यामोठ्या रांगा लावून वधू वरांची भेट घेतात. त्यातदेखील 'व्हीआयपिंची' घुसखोरी होते ती निराळीच. हा भेटीचा कार्यक्रम साधारणतः साडेतीन चार पर्यंत चालतो मगच वऱ्हाड्यांची सुटका आणि वधू वरांची जेवणाची सुट्टी होते. खरी गंमत तर जे पाहुणेमंडळी घाईवर असतात व ज्यांना हे लग्न उरकून इतर ठिकाणी कार्यक्रमाला जायचे असते त्यांची पाहायला मिळते. लग्न लागताच लगोलग जेवण करून किंवा न जेवताच त्यांची वधू वरांना भेटण्याची लगबग सुरू होते. मात्र भटजींचे विधी सुरू असल्याने त्यांनी अनेकदा केलेला प्रयत्न बऱ्याचदा निष्फल ठरतो. सर्व विधी आटोपून रीतसर रिसेप्शनमध्ये सामील होण्यापर्यंत वेळ त्यांच्याकडे नसतो. त्यामुळे वधू वरांच्या कुटुंबियांना भेटूनच काढता पाय घेण्यापर्यंत ते मजल मारतात. वास्तविकता वधू वरांना त्या दिवशी इतकी माणसे भेटतात की कोण आले व कोण गेले हे पाहण्यासाठी त्यांना नंतर फोटो अल्बमचा आधार घ्यावा लागतो. आजच्या धावपळीच्या युगात जवळचे नातलग सोडले तर बाकी वऱ्हाडी मंडळी केवळ हजेरी लावण्याइतपत लग्नसमारंभास उपस्थिती लावत असतात. तासा दोन तासांच्या उपस्थितीनंतर घाईघाईत कार्यक्रमाचा निरोप घेण्याकडे अनेकांचा कल असतो. एकापेक्षा अधिक लग्नकार्य अटेंड करायची असतील तर ही लगबग अधिक वाढते. वधू वर विधींमध्ये मग्न असताना यजमान मंडळींची गाठ भेट घेऊन बरेचजण निरोप घेतात. परस्थितीची जाण असल्याने म्हणा किंवा समारंभात दंग असल्याने म्हणा यजमान मंडळीदेखील फार आढेवेढे घेऊन सर्व उरकेपर्यंत थांबण्याचा आग्रह करत नाहीत. अशा अनेक बारीकसारीक गोष्टींनी लग्नसमारंभात एक वेगळीच रंगत पाहायला मिळते. लग्नकार्यासारख्या शुभप्रसंगी दोन कुटुंबे परस्परांच्या सुखदुःखाशी जोडली जात असल्याने त्या आनंदात ह्या सामान्यतः घडणाऱ्या छोट्यामोठ्या गोष्टीही फार आनंददायी व लक्षवेधक ठरतात आणि कायम लक्षात राहतात एव्हढ्यासाठीच हा लेखप्रपंच..


वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई



Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त