अपघाती मृत्यू रोखण्याचे आव्हान
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
अपघाती मृत्यू रोखण्याचे आव्हान
आपल्या देशात अपघाती मृत्यूंचे प्रमाण वाढत चालले आहे. दररोज हजारो मृत्यू केवळ विविध अपघातामध्ये सापडल्याने होत आहेत. अपघात झाल्यानंतर तात्काळ आवश्यक सुविधा उपलब्ध न झाल्याने ५० टक्के रुग्णांचा रुग्णालयात नेण्याअगोदरच मृत्यू होतो. घटनास्थळावर सर्वप्रथम बघ्यांची गर्दी होते. त्यानंतर पहिली भुमिका ही डॉक्टरांची नाही, तर पोलिसांची येते. बऱ्याचदा कायदेशीर बाबींच्या पूर्ततेसाठी व त्या भीतीपोटी तास न् तास अपघातातील रुग्ण मदतीशिवाय रस्त्यावरच तडफडत असतात व त्यातच वेळ गेल्यामुळे त्यांना मृत्यू ओढवतो. अशा परिस्थतीत जर रुग्णाला वेळीच उपचार मिळाले तर रुग्ण वाचण्याची शक्यता अधिक असते. तत्कालीन केंद्रीय ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर अपघातांचा विषय ऐरणीवर आला होता. या अपघाताच्या चौकशीपासून ते रस्त्यांची अवस्था, वाहतूक नियंत्रण धोरणापासून वाहतूक कायद्यांची चर्चा झाली. पण दुर्दैवाने आरोग्याच्या दृष्टीने अपघाताची चर्चा होताना दिसत नाही. अपघातामुळे येणारा अधूपणा तर खिजगणतीतच नाही. अपघातासारखी सहज टाळता येणारी गोष्ट गांभीर्याने घतली जात नाही. अपघाताची कारणमिमांसा व ते टाळता येण्यासाठी काय उपाययोजना आखाव्यात यासाठी निश्चित धोरण ठरविले गेले पाहिजे. त्याची पुरेशा प्रमाणात जनजागृती होणेदेखील गरजेचे आहे. आज प्रमुख महामार्गांवर ब-याच ठिकाणी संभाव्य अपघात रोखण्यासाठी बॅनर, होडिंग्जच्या माध्यमातून स्लोगन लावण्यात येत आहेत ज्यायोगे अतिवेगाने होणारे अपघात रोखता येतील. अपघाती रुग्णांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणारी दोन महत्त्वाची कारणे म्हणजे अपघातानंतरच्या पहिल्या तासात म्हणजेच ‘गोल्डन अवर’ संबोधल्या जाणाऱ्या तासात उपचार न मिळणे व अपघात झाल्यावर लगेचच जागेवर रुग्ण जिवंत ठेवण्यासाठीचे ‘बेसिक लाइफ सपोर्ट’ उपाययोजना न होणे. शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने १०८ या टोल फ्री क्रमांकाव्दारे सर्व उपकरणांनी सुसज्ज अशा आपात्कालीन रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. अपघातानंतर १०८ या टोल फ्री क्रमांकावर फोन केल्यास तात्काळ अपघातस्थळी ही शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध होते व अपघातग्रस्त रुग्णाला पहिल्या सुवर्णतासात वैदयकीय उपचार मिळतात. वास्ताविकतः अपघात झाल्यानंतर करावयाच्या उपाययोजनांचा अधिक विचार केला जातो मात्र अपघात होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक काळजी घेणेही फार महत्वाचे आहे.
हेल्मेट व सीटबेल्ट सक्ती ही अपघात रोखण्यासाठीची कायमस्वरूपी उत्तरे असू शकत नाहीत. तो उपाययोजनांचा एक भाग असू शकतो पण त्यासाठी अपघात टाळण्यासाठी आम्ही स्वतःच स्वतःची जबाबदारी घ्यायला हवी. सीट बेल्ट व हेल्मेट या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेतच व त्या प्रत्येकाने आवर्जुन वापरायला हव्या. पण एक लक्षात घ्यायला हवे की, ती अपघाताची तीव्रता कमी करणारी साधने आहेत, अपघात टाळण्यासाठीची नव्हे. मद्यपान तसेच कामाच्या अतिरिक्त ताणामुळे वाहनचालकाकडून होणाऱ्या चुका बहुतांश अपघातांना कारणीभूत ठरतात. राष्ट्रीय महामार्गांवर होणाऱ्या भीषण अपघातांमध्ये ७० टक्के वाहनचालकांच्या रक्तात मद्याचे प्रमाण आढळून येते. अवजड वाहनांचे वाहनचालक मद्यपान व इतर व्यसने का करतात, यावरील संशोधनात कामाचा अती ताण, झोपेच्या कमतरतेमुळे शारीरिक थकवा अशी कारणे दिसून येतात. कामाच्या अतिताणामुळे छोट्या वाहनांनाही अपघात होतात. आम्ही इतर वेळी कामाच्या वेळेचे व्यवस्थापन करतो पण प्रवासाच्या बाबतीत ते दिसत नाही. वेळेची बचत करण्यासाठी रात्रीच्या प्रवासाकडे जास्त कल असतो. रात्रीच्या वेळी अपघातांची शक्यता दुपटीने वाढते. खासगी वाहन कंपन्यांच्या रातराण्यांना मिळणारी पसंती ही खरोखरीच चिंताजनक आहे. त्यानंतर अपघातांसाठीचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे वेग. त्यातच तरुण वयोगटात वेग ही शरीर व मनाचीच अंगभूत प्रवृत्ती असल्याने तरुणांमध्ये अपघात मोठ्या प्रमाणात दिसून येतात. वेगाशी स्पर्धा करण्याच्या नादात जिवाशी होणारा खेळ चिंतेचे कारण आहे. महामार्गांवरील अपघात टाळण्यासाठी एक ठराविक वेगमर्यादा आखुन दिलेली असते मात्र त्याचे पालन बहुतांशी वाहनचालक करताना दिसत नाहीत. आयुष्याला आलेल्या वेगामुळे आम्हाला प्रगत झाल्यासारखे वाटते आहे, पण त्या वेगामुळे होणारी दमछाक आमच्या लक्षात येत नाही. त्यामुळे वेगाला संयमाची जोड असेल तर अपघात नक्कीच टाळता येतील. जगात दररोज सुमारे तीन हजारांहून अधिक लोक रस्त्यावर अपघातामुळे मृत्युमुखी पडतात.
भारतात सुद्धा अपघाताचे दर वाढत असून रस्त्यावरील वाढलेली रहदारी, वाहन संख्या, वाहतूकसंबंधी नियमांचे योग्य पालन न होणे, सर्वसामान्यांमध्ये वाहतूक नियमांबद्दलचे अज्ञान हि कारणे प्रामुख्याने जबाबदार आहेत. प्रगत देशांमध्ये चार चाकी वाहनांमुळे तर प्रगतीशील देशांमध्ये दुचाकी वाहनांमुळे रस्त्यावरील अपघात अधिक होतात असे निरीक्षणास आलेले आहे. अपघात होण्यास वाहन चालकाची वागणूक, कमजोर नजर व श्रवण शक्ती हे घटकदेखील कारणीभूत आहेत. अपघात टाळण्यासाठी शालेय जीवनापासूनच विदयार्थ्यांना वाहतुक नियमांबददल, अपघातास कारणीभूत घटक व सुरक्षात्मक उपाय योजनेची व अपघात झाल्यास प्राथमिक उपचाराची सक्तीची माहिती दिली गेली पाहिजे. व्यवस्थित निगा राखलेले वाहनच चालविणे गरजेचे आहे. दुचाकी चालविताना हेल्मेटचा वापर, चारचाकी वाहन चालविताना सिट बेल्ट लावणे, वाहन चालविताना मोबाईलचा वापर न करणे, रस्त्यांना अनुसरुन योग्य वाहन निवडणे, वाहनांची दारे व्यवस्थित बंद होतात व इतर यंञणा व्यवस्थित असल्याची खाञी करणे, वाहन चालवताना मदय व अंमली पदार्थाचा वापर टाळणे, गती मर्यादा पाळणे यासारखे सुरक्षेचे उपाय अंमलात आणणे आवश्यक आहे. रस्त्यावरील वाढलेल्या भरमसाठ वाहनांमुळे वाहतूक अनियंत्रित स्वरुपाची झाली असुन त्यामुळे अपघातांच्या संख्येत दिवसेंदिवस भरच पडत आहे. त्यामुळे वाहनसंख्येवर नियंत्रण आणण्याबरोबरच अपघातांमुळे होणारे मृत्यू रोखण्याचे माठे आव्हान आगामी काळात असणार आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps


Comments
Post a Comment