घनसोलीच्या गवळीदेव परिसराचा लवकरच विकास
मुंबईच्या वाढत्या गर्दीला पर्याय म्हणून सिडकोने नवी मुंबई ही सुनियोजित नगरी वसवली. सर्व प्रकारच्या अद्ययावत सुखसोयींनी युक्त असे हे एकविसाव्या शतकातील शहर संपूर्ण देशात अग्रेसर आहे. मात्र नवी मुंबईत म्हणावे तसे लक्षवेधक पर्यटन स्थळ विकसित होऊ शकले नाही ही एक शोकांतिकाच म्हणावी लागेल. बेलापूरचा पारसिक हिल परिसर, खारघरचा पांडवकडा धबधबा याबरोबरच घणसोलीचा गवळी देव व सुलाई देवी डोंगर हेदेखील एक चांगले पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते. मात्र या पर्यटन स्थळाकडे म्हणावे तितके लक्ष दिले न गेल्याने अद्याप या ठिकाणाचा विकास होऊ शकलेला नाही. याच पार्श्वभूमीवर आता घणसोली येथील एकमेव नैर्सगिक पर्यटन स्थळ गवळी देव व सुलाई देवी या दोन डोंगरांचा विकास करण्याचा निर्णय पालिका व वनविभागाने घेतलेला आहे. या पर्यटन स्थळाच्या विकासासाठी वन विभागाने मागणी केल्याप्रमाणे निधी महानगरपालिकेने मंजूर केलेला असून लवकरच या भागाचा विकास पुण्यातील पर्वती डोंगरासारखा होऊ शकणार आहे. पावसाळ्यात या ठिकाणी निर्माण होणारा धबधबा हा नवी मुंबईकरांच्या आर्कषणाचे केंद्र आहे. पर्यटन स्थळांचा वापर बहुतांशी व्यावसायिक वापरासाठी होत असल्याने नैसर्गिक स्थळे लुप्त होत चालली आहेत. बेलापूरजवळील पारसिक डोंगराचाही सिडकोने व्यावसायिक उपयोग सुरू केल्याने या भागात डोंगरावर श्रीमंतांचे अनेक बंगले जागोजागी दिसतात. अनेक वर्षांपूर्वी घणसोली, तळवली, गोठवली या तीन गावांतील गाई-गुरे चरण्याचे ठिकाण म्हणून गवळी देव डोंगराचा वापर केला जात असे. त्या ठिकाणी गुराख्यांनी श्री गणेश आणि श्री कृष्ण या देवतांची प्राणप्रतिष्ठा करून पूजा सुरू केलीे. त्यामुळे या डोंगराला महत्त्व प्राप्त झालेे. मफतलाल समूहाच्या नोसिल कपंनीने हा डोंगर भाडेपट्टय़ाने घेऊन विकसित केला असून त्या ठिकाणी पाच लाख झाडांचे संवर्धन केले आहे. नोसिल बंद पडल्यानंतर या डोंगराची अक्षरश: वाताहत झाली होती. नोेसिलने विकसित केलेल्या गवळी देव डोंगराचा पालिकेने विकास करावा अशी मागणी नवी मुंबईकरांकडून सातत्याने केली जात होती. त्यानुसार पालिकेने ठाण्याच्या वनसंरक्षक कार्यालयाकडे हा डोंगर भाडेपट्टय़ावर देण्याची मागणी केली होती पण वनविभागाने ती नाकारली. नवी मुंबई कार्यक्षेत्रातील या डोंगराचा विकास करण्यासाठी निधी देण्यासाठी वनविभागाने पालिकेला कळविले होते. त्यासाठी या डोंगराचा पर्यटन म्हणून विकास करताना तेथे स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गार्बियन पद्धतीने डोंगरांच्या कडे-कपारींचे संरक्षण, डोंगराच्या माथ्यावर जाण्यासाठी लागणाऱ्या शेकडो पायऱ्या, विहिरी, तलावांची स्वच्छता, पर्यटन विश्रांतीकक्ष, बसण्याच्या व्यवस्था अशा सुविधा लागणार असून त्यासाठी दोन कोटी ८४ लाख रुपये पालिकेने मंजूर केले आहेत. स्थानिक आमदार श्री संदीप नाईक यांनीदेखील याकामी पाठपुरावा करून आपल्या आमदार निधीतून या कामी निधी उपलब्ध केलेला आहे. त्यामुळे लवकरच या भागाच्या विकासाला सुरुवात होणार आहे. या खर्चात जवळच असणाऱ्या सुलाई देवी डोंगराचाही विकास केला जाणार असून त्यावर जवळपास एक कोटी रुपये खर्च केले जाणार असल्याचे समजते. वास्तविकता नवी मुंबई आज सर्व बाबतीत स्वयंपूर्ण असून नागरी सेवा व स्वच्छतेच्या बाबतीत केंद्र शासनाचे अनेक पुरस्कार पालिकेला मिळालेले आहेत. मात्र पर्यटनाच्या दृष्टिकोनातून या नगरीचा विचार होत नाही ही शोकांतिका आहे. नवी मुंबईत राहणाऱ्या नागरिकांना किंवा या नगरिस भेट देण्याऱ्या लोकांना पाहण्यासाठी आकर्षण असलेली ठिकाणे इथे अस्तित्वात नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे येथील सिमेंट काँक्रीटच्या जंगलात शिल्लक राहिलेले डोंगरमाथे व त्यावरील निसर्गसंपत्तीचा पर्यटनाच्या दृष्टीने विचार केल्यास ह्या नगरीचे सौंदर्य व महत्व अधिक वाढेल अशी अपेक्षा आहे. पर्यटनस्थळांच्या सौंदर्यास बाधा निर्माण करणारे घटक जसे मद्यपी, अतिउत्साही पर्यटक यांचेवर अंकुश ठेवणेदेखील तितकेच महत्वाचे असून गवळीदेव परिसराचा विकास केल्यानंतर त्याकडे कटाक्षाने लक्ष देणे गरजेचे आहे. वनविभाग, पालिका व सिडको यांचेमार्फत या ठिकाणी पूर्णवेळ सुरक्षारक्षक नियुक्त करायला हवेत जेणेकरून पर्यटकांच्या उत्साहास गालबोट लागणार नाही व नवी मुंबईतील नागरिक कुटुंबासह या स्थळाचा आनंद घेवू शकतील.


Comments
Post a Comment