नागरिकांचीही जबाबदारी
अनधिकृत बांधकामे व धोकादायक इमारतींवर नियंत्रण ठेवणारी मोठी यंत्रणा पालिका प्रशासनाकडे असतानादेखील अशा बांधकामांचे शहरांमध्ये पेव फुटले आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम साहित्य सर्रास वापरले जात असल्याने बांधकामांचा टिकाऊपणा हा केवळ दिखाऊपणा झालेला आहे. यामुळेच दरवर्षी इमारती कोसळण्याच्या घटना सर्वत्र घडत आहेत व त्यात निष्पाप नागरिकांचे नाहक बळी जात आहेत. मालाडमधील दीड वर्षांपूर्वी बांधलेली भिंत कोसळून तब्बल दोन डझनच्या वर बळी जाण्याची घडलेली घटना चीड आणणारी आहे. पुण्यातदेखील नुकतीच अशीच घटना घडून अनेकांचे जीव गेले. याला जितके जबाबदार पालिका अधिकारी व लोकप्रतिनिधी आहेत तितकीच जबाबदारी नागरिकांचीदेखील आहे. धोकादायक बांधकामांची माहिती तात्काळ प्रशासनाला देऊन त्यावर त्वरित उपाययोजना करण्याची काळजी नागरिकांनी घेतली तर सातत्याने घडणाऱ्या अशा घटना रोखता येऊ शकतील.

Comments
Post a Comment