सोशल मीडियाने बिघडतेय आरोग्य


सोशल मीडियाचा वापर आज आपल्यातला प्रत्येकजण सर्रास व नियमित करतो. मोबाईल, इंटरनेटमधल्या विविध ऍप्सनी आपले दैनंदिन जीवन व्यापून टाकले आहे. फोनमधील सोशल मीडियाच्या दर्शनानेच आपल्या दिवसाची सुरुवात होते.आपल्या  आयुष्यात घडलेल्या लहान सहान गोष्टीही आपण सोशल मीडियावर सहज शेअर करतो. काही वेळ इंटरनेट बंद पडले तर किंवा कनेक्शन नीट मिळत नसेल तर आपण अस्वस्थ होतो. व्हाट्सएप,फेसबुक, ट्विटर सारखी आपल्या रोजच्या जीवनाचा अविभाज्य अंग झालेली ऍप्स काही वेळ जरी बंद असतील तर आपल्याला चुकल्याचुकल्यासारखे वाटते. मात्र ही स्थिती आरोग्याच्या दृष्टीने धोक्याची घंटा वाजवणारी आहे. आपण या सोशल मीडियावर आज इतके निर्भर झालेलो आहोत की याचे एक प्रकारचे व्यसन आपल्याला जडलेय जे अत्यंत धोकादायक आहे. चिंतेची बाब हीच आहे की येणारी पिढी या व्यसनाच्या संपूर्णतः आहारी गेल्याचे पाहायला मिळत आहे. आज कॉलेज तरुण तरुणी, शालेय मुले यांच्या हातात कधीही कुठेही पाहिले तरी अँड्रॉईड फोन पाहायला मिळतात. इंटरनेट चे दर देखील आज फार महाग राहिलेले नसल्याने दिवसाचा संपूर्ण वेळ ऑनलाईन राहण्यात ते व्यस्त असतात. इंटरनेटचे मायाजाल इतके खोल आहे की त्यात एकदा रुतले की बाहेर पडणे अवघड होऊन जाते. वस्ताविकता सोशल मीडियाची नवी नवलाई संपून त्याने आपले आयुष्य व्यापून टाकूनही आता बराच काळ झालाय. आताची पिढी ही फेसबुक पिढी, व्हॉटस्अॅप पिढी, इन्स्टाग्राम, ट्विटर पिढी म्हणून ओळखली जाते. प्रत्येकाला इथे व्यक्त व्हायला व आपले कौतुक करून घ्यायला आवडते. मात्र याच सोशल मीडियामुळे माणसाचे मानसिक आरोग्य धोक्यात आले आज. सोशल मिडीयावर अवलंबून असणाऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. मार्क झुकरबर्गच्या मते प्रत्येक फेसबुक युजर दिवसातील कमीत कमी ५० मिनिटे फेसबुकवर घालवतो आणि इन्स्टाग्राम वर ६० ते ८० मिनिटे घालवतो. तसेच बराच कालावधी व्हाट्सएपच्या वापरावर घालवतो. त्याचा परिणाम सगळ्याच वयोगटातील वापरकर्त्यांच्या वागणुकीवर, कामावर, अभ्यासावर, व्यवसायावर व दैनंदिन जीवनपद्धतीवर जाणवायला लागला आहे. वस्तुतः सोशल मीडियाचे व्यसन स्वतंत्र मानसिक आजार मानला जात नाही. मात्र हा व्यसनाचाच एक प्रकार मानला जातो. सोशल मीडीयाच्या अतिरेकी वापराच्या केसेस मानसोपचारतज्ज्ञांकडे आणि समुपदेशकांकडे येत आहेत. यात १० ते १८ वयोगटातील मुलांच्या आणि १८ ते ३० वयोगटातील तरुणांच्या केसेसचे प्रमाण ७० टक्के आहे. साधारणपणे ८० ते ९० टक्के वाढ अशा प्रकारच्या केसेसमध्ये दिसून येत आहे. सोशल मीडियाने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाल्याच्या अनेक घटना घडत आहेत. मागील वर्षी सोशल मीडीयाच्या अतिरेकी वापरामुळे परीक्षेला न बसलेल्या मुलांची संख्या बरीच होती. प्रत्येकजण इथे अपडेट राहण्याचा व इतरांना अपडेट ठेवण्याचा प्रयत्न करतो आणि आणि त्यासाठी सोशल मिडियापेक्षा अधिक चांगला पर्याय नाही असे समजतो. ही बाब काही अंशी खरीदेखिल आहे. आज सर्वच घडामोडी ह्या याच सोशल मीडियावर सर्वप्रथम शेअर केल्या जातात त्यामुळे प्रिंट मीडिया, न्युज मीडिया हे घटक सोशल मीडियाच्या काहीसे मागे आहेत. सोशल मीडियाने कुटुंबव्यवस्थाही ढवळून निघाली आहे. इनमिन तीन जणांच्या कुटुंबाचादेखील व्हॉटस्अॅप ग्रुप असतो. कुटुंबातील सुखदुःखाच्या सर्वच गोष्टींची देवाणघेवाण या ग्रुपवरूनच केली जाते. इतकेच काय तर 'येताना भाजी घेऊन या' सांगणारा मेसेज पाठवण्यापर्यंत परिस्थिती निर्माण झाली आहे! यातील विनोदाचा भाग सोडला तर संवादांचे प्रमाण कमी होत चालले असल्याचे आपल्याला दिसून येईल. सतत सगळ्यांनी आपल्याकडे लक्ष द्यावे यासाठीची धडपड, आभासी जगात सतत वावर यांसारखे कितीतरी मानसिक आजार सोशल मीडीयाच्या अनिर्बंध वापरामुळे होतात. तुम्ही एखाद्या महत्त्वाच्या कामामध्ये आहात जिथे तुम्हाला फोनचा वापर करता येत नाही आणि सोशल मीडियावर येणारे मेसेजेस, नोटिफिकेशन्स तुम्ही पाहू शकत नाही. त्यावेळी मनाची होणारी घालमेल, उत्सुकता आणि चिंता याला सोशल मीडिया एन्झायटी असे म्हटले जाते जो एक विकार आहे. हा विकार नक्कीच काळजी करण्यासारखा आहे. सोशल मिडियावरचे काहीतरी आपल्या हातून सुटत तर नाही ही काळजी, व्हॉटस्अॅप, फेसबुक, इन्स्टाग्रामवर जाऊन मेसेज तपासत रहाणे, सतत सगळ्यांशी कनेक्ट राहण्यासाठी धडपडणे हा देखील सोशल मीडियामुळे जाणवणारा आजाराच आहे. वास्तविक आयुष्यातील अपेक्षा पूर्ण होत नाहीत म्हणून सोशल मीडीयावरील आभासी जगात ते प्राप्त करून घेणे व त्यानंतरही आपल्या मनासारखे होत नाही, असे लक्षात आल्यावर निराशा येणे हेदेखील नैराश्याचे लक्षण आहे. सोशल मीडियाचा वापर करता आला नाही, तर अस्वस्थ होणे, कामावरून लक्ष विचलित होणे. सातत्याने सोशल मीडीयावर असण्याने नातेसंबंधांवर, कामावर, अभ्यासावर परिणाम होणे. ही सर्वसामान्य लक्षणे असून वेळीच त्याची दखल घेतली पाहिजे व त्यापासून परावृत्त होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सोशल मीडीयाच्या अनिर्बंध वापराच्या परिणामांची जाणीव हळूहळू काही लोकांना व्हायला लागली आहे. सोशल मीडिया आणि बदलत जाणारे तंत्रज्ञान यांचा मानसिक आरोग्यावर दूरगामी परिणाम होत आहे. तंत्रज्ञान आणि आपल सहजीवन सुरळीत ठेवायचे असेल, तर सोशल मीडिया आणि आयुष्याचा समतोल सांभाळता यायला हवा. शेवटी स्वतःवरील नियंत्रण, स्वयंशिस्त आणि संवाद यातूनच मानसिक आरोग्याचा आणि आयुष्याचा समतोल राखता येणार आहे. आभासी जगातील आकर्षणे तर खूप आहेत, पण त्यांच्या आहारी न जाता तंत्रज्ञानाचा, सोशल मीडीयाचा वापर प्रगतीसाठी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करण्याची गरज आहे. सोशल मीडियाचा अनिर्बंध वापर जर वेळीच रोखला गेला नाही तर त्याचे दूरगामी परिणाम व्यक्तिगत, सामाजिक व देशाच्या प्रगतीवर होताना दिसतील. मानसिक आजारांना बहुतांशी कारणीभूत ठरणारा महत्वाचा घटक म्हणून भविष्यात सोशल मीडियाचा उल्लेख होणार आहे. त्यामुळे आपण एक जबाबदार नेटीझन्स म्हणून हा संभाव्य धोका आताच ओळखा व त्यापासून हळूहळू परावृत्त होण्याचा प्रयत्न करा. 




वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त