मोदींची प्लॅस्टिक मुक्त संकल्पना
स्वातंत्र्यदिनाच्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्लास्टिक मुक्तीचा उल्लेख करून प्लॅस्टिकसारख्या समस्येचे गांभीर्य अधोरेखित केले आहे. प्लास्टिक हा अविघटनशील घटक असल्यामुळे निसर्गात त्याचा निचरा होत नाही. यामुळे जमा झालेले प्लास्टिक रसायनाचे रूप धारण करते व ते मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. निसर्गदेखील त्याला पचवू शकत नसल्याने त्याचा अतिरिक्त भार पर्यावरणावर पडतो व त्याचे देखील संतुलन बिघडते. खरेतर प्लॅस्टिकजन्य पदार्थांपासुन बनवलेल्या राष्ट्रध्वजावर बंदी असतानादेखील प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनी असे ध्वज सर्रास रेल्वे स्टेशन, बाजार, बस थांबे, रस्त्यारस्त्यांवर कसे उपलब्ध होतात हा प्रश्न पडतो, त्यामुळे असे राष्ट्रध्वज खरेदी न करण्याची जबाबदारी भारतीय नागरिकांचीच आहे. कापडी किंवा कागदी राष्ट्रध्वजच तसेच पिशव्याच वापराव्यात, त्यांची योग्य प्रकारे हाताळणी करावी व वापर झाल्यावर उचित मार्गाने विघटन करावे. पर्यावरण संतुलनाला हातभार लावणे हि प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे, त्यामुळे मोदींची 'प्लॅस्टिकमुक्त भारत' हि संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सर्व भारतीयांचा सहभाग तितकाच महत्वाचा आहे.

Comments
Post a Comment