खातेदार वेठीस का
पंजाब अँड महाराष्ट्र बँक घोटाळ्यात खातेधारकांची खाती गोठवणे म्हणजे चोर सोडून संन्याशाला फाशी देण्यासारखे आहे. हजारो कोटी कर्ज देऊन व त्यासाठी बोगस खाती बँकेत उघडून बँकेच्या, आरबीआयच्या व एचडीआयएल कँपणीच्या अधिकाऱ्यांनी खातेधारकांची फसवणूक केली व त्यांची कष्टाची कमाई हडप केली. मात्र हा घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकेच्या खातेधारकांनाच त्यांच्या खात्यातून पैसे काढण्यास मनाई करण्यात आली. हा प्रकार म्हणजे खातेधारकांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून संशयाच्या भोवऱ्यात आणण्यासारखे आहे. आयुष्यभराची स्वकष्टाची कमाई बँकेत गुंतवून लोकांनी मोठी घोडचूक केली काय? याचा खुलासा एकदा सरकारने व आरबीआयने करायला हवा. जेणेकरून यापुढे कोणत्याही बँकेत पैसे गुंतवण्यापूर्वी लोक हजारदा विचार करतील. घोटाळेबाजांवर कडक कारवाई करून त्यांची संपत्ती जप्त करावी मात्र सर्वसामान्य खातेधारकांची पुंजी हडप करून त्यांना वेठीस धरणे कितपत योग्य आहे?

Comments
Post a Comment