देर आये दुरुस्त आये
२०२२ पर्यंत मेल व एक्सप्रेस गाड्यांच्या सर्व डब्यांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्याचा रेल्वेचा निर्णय म्हणजे 'देर आई दुरुस्त आई' अशाच प्रकारचा आहे. रेल्वे प्रवासात घडणारे विविध प्रकारचे छोटे मोठे गुन्हे, अपप्रकार रोखण्यासाठी हा निर्णय यापूर्वीच घ्यायला हवा होता. प्रवाशांच्या सामानाची सुरक्षा, चोरी, वादविवाद, मारहाण यासारखे प्रकार सीसीटीव्ही देखरेखीखाली येणार असल्यामुळे समाजकंटक व चोरांवर नक्कीच अंकुश लागेल. त्याचबरोबर प्रवाशांचे तिकीट निरीक्षकांबरोबर होणारे वाद व रेल्वे कर्मचाऱ्यांची अरेराविदेखील बऱ्याच अंशी कमी होईल अशी आशा करण्यास हरकत नाही. आज भारतीय रेल्वे प्रवास म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत बेहरवशाचा मानला जातो. रेल्वेत सुरक्षा कर्मचारी तैनात असले तरी त्यांचा वावर फार अपवादानेच जाणवतो. त्यांचे काम सीसीटीव्ही यंत्रणा करणार असल्यामुळे अनुचित प्रकारांना नक्कीच आळा बसेल व प्रवाशांनादेखील सुरक्षिततेची हमी मिळेल अशी आशा आहे. ह्या सीसीटीव्ही यंत्रणेची देखभाल व्यवस्थित होईल व अपप्रकार उघडकीस आणण्यासाठी त्याचा प्रभावी वापर होईल अशी रेल्वेकडून अपेक्षा आहे.


Comments
Post a Comment