समाजकार्यात हरवलेले व्यक्तिमत्व
आमचे परममित्र व सामाजिक कार्यातील मार्गदर्शक श्री गणेश हिरवे सरांना सर्वप्रथम वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा. खरेतर हिरवे सरांशी माझा परिचय गेल्या चार पाच वर्षांचाच. एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलो व विचारांची जुळणी झाल्याने संपर्क वाढला आणि नंतर त्यांच्या अनेक सामाजिक उपक्रमांचा मीदेखील एक भाग झालो. खरेतर आपल्यासारख्या कुटुंबवत्सल लोकांना कुटुंब, नोकरी वा व्यवसाय या जबाबदाऱ्यातुन वेळ काढणे म्हणजे एक दिव्यच. त्यातून वेळ मिळालाच तर आपण एखादा आवडीचा छंद जोपासतो. माझेच उदाहरण घेतले तर कौटुंबिक व्याप व नोकरीतील व्यस्तता यातून दररोजच्या लिखाणासाठी वेळ देणे फारच जिकरीचे होत होते. त्यातुनच लोकलप्रवासात लिखाण करण्याचा मध्यम मार्ग मी निवडला. (हा लेखदेखील लोकलप्रवासातच लिहिला आहे बरं). असो, तर दैनंदिन व्यापातून वेळ काढून सामाजिक बांधिलकी जोपासणे व समाजकार्यात स्वतःला झोकून देणे हा विचार सर्वसामान्य व्यक्ती करू शकत नाही. मात्र गणेश हिरवे सरांचे कार्य व त्यांची त्यातील तत्परता आपण जर पहिली तर हा माणूस इतक्या साऱ्या गोष्टी यशस्वीपणे कशा करू शकतो याचे मला खरेतर अप्रूप वाटते. पत्रलेखनाच्या माध्यमातून आपले सामाजिक जीवन सुरू करणाऱ्या हिरवे सरांचा मूळ पेशा शिक्षकी आहे. ज्ञानदानातील अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. सामाजिक कार्य व पत्रलेखनासाठी त्यांना आजवर 61 पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रक्तदानाने महत्व व सामाजिक गरज ओळखून त्यांनी आतापर्यंत स्वतः 25 वेळा रक्तदान केलेले आहे. जोगेश्वरी येथे वास्तव्य करणारे हिरवे सर परिसरातील प्रत्येक सामाजिक, धार्मिक, राजकीय व क्रीडाविषयक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेतात त्यामुळेच त्यांचा जनसंपर्कदेखील खूप दांडगा आहे. माणसे जोडण्याचा त्यांना मोठा छंद आहे. निस्वार्थी भावनेने समाजकार्य करणारी अनेक माणसे त्यांनी आपल्या जॉय ऑफ गिव्हिंग या सोशल माध्यमातील ग्रुपद्वारे जोडलीत ज्यांच्या माध्यमातून त्यांनी अनाथ, वृद्ध, गरीब लोकांसाठी अनेक उपक्रम साजरे केले आहेत. सामाजिक बंधीलकीतून आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून लोकवर्गणीतून व प्रसंगी स्वतःची पदरमोड करून त्यांनी गरजूंना मदत केली आहे. आणि म्हणूनच मी त्यांच्या या उपक्रमांचा भाग आहे याचा मला खूप अभिमानच वाटतो. जोगेश्वरी येथील श्री समर्थ विद्यालय स्कूल कमीटीचे ते सभासद आहेत. राजहंस प्रतिष्ठान, गोरेगावचे सभासद असून त्या माध्यमातून अवयवदान व देहदान चळवळीसाठी त्यांनी सक्रिय योगदान दिलेले आहे. माजी पोलीस आयुक्त श्री वसंत ढोबले साहेब यांच्या मिसिंग पर्सन ब्यूरो या हरवलेलया व्यक्ति शोधून काढणाऱ्या NGO चेदेखील ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्याचबरोबर श्री अभिजीत राणे यांची धड़क कामगार यूनियनचे कौन्सिल मेंबर अभिजीत राणे यूथ फौन्डेशन या सामाजिक संस्थेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख, जॉय ऑफ गिविंग या सामाजिक संस्थेचे संस्थापक, मुंबईतील विविध सामाजिक संस्था व उत्सव मंडळांवर सल्लागार, दै मुंबई मित्र चे प्रतिनिधी, संत निरंकारी आध्यात्मिक मिशन चे सक्रिय कार्यकर्ते, एपीजे अब्दुल कलाम मोफत वृत्तपत वाचनालयाचे संस्थापक व संत नामदेव परीवाराचे कार्यकर्ते असा त्यांचा सामाजिक क्षेत्रातील प्रवास व लेखाजोखा आहे. इतका सारा व्याप सांभाळून ते आपल्या मित्रमंडळीबरोबर कायम संपर्कात राहतात व विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करतात, त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. हिरवे सरांबरोबर माझा संपर्कदेखील खूप वाढला असून एखादा ज्वलंत विषय घेऊन अधूनमधून मला आवर्जून फोन करतात व आपली भूमिका वृत्तपत्रांच्या माध्यमातून मांडण्यासाठी बजावतात. अत्यंत प्रामाणिक हेतूने समाजासाठी झोकून देऊन काम करणारी गणेश हिरवे सरांसारखी माणसे खरेतर या मतलबी जगात दुर्मिळच असून त्यामुळेच आम्हाला त्यांचा हेवा वाटतो. सामाजिक सेवेतील व्यापातून पुरेसा वेळ काढून त्यांनी आपले कौटुंबिक स्वास्थ्यदेखील उत्तम जपले आहे. पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार असून त्यांच्याशी बोलताना नेहमीच त्यांची परिवराप्रति असलेली एक अतूट जोड व निसंदिग्ध प्रेमभावना प्रकट होते. माझ्यातील वृत्तपत्रलेखक जागता ठेवण्यामध्ये हिरवे सरांचा खूप मोठा वाटा असून त्याबद्दल माझ्या मनात त्याचेंबद्दल नितांत आदर आहे. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त न राहवल्याने त्या भावना मी लेखणीद्वारे व्यक्त करत आहे. ईश्वर त्यांना लोकसेवेसाठी उदंड आयुष्य देवो हीच यानिमित्ताने सदिच्छा. धन्यवाद !!
वैभव पाटील



छान लिहिले ,शुभेच्छा💐💐💐
ReplyDeleteहिरवे सरांना शुभेच्छा आणि त्यांच्या कार्याचा लेखा जोखा ही उत्तम मांडल्यामुळे वैशिष्ट्ये समजली छान!!💐💐
ReplyDelete