आंतरशालेय समूह गान स्पर्धेत अडवली भुतावली प्रथम
नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागामार्फत शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आंतरशालेय सांस्कृतिक व कला महोत्सव २०१९-२० नुकताच आयोजित करण्यात आला होता. या स्पर्धांमधील समूह गान स्पर्धेत नमुमनपा शाळा क्रमांक ४१, अडवली भुतावली या शाळेने प्राथमिक गटात प्रथम क्रमांक पटकावला. २६ फेब्रुवारी २०२० रोजी आयोजित या कलाविष्कार स्पर्धांमध्ये अडवली भुतावली शाळेतील मुलींनी समूह गायन स्पर्धेत प्राथमिक गटात 'मन कि वीरा' हे गाणे सादर करत उपस्थितांना मंत्रमुग्ध केले ज्यात त्यांना प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. अडवली भुतावली ही आदिवासी भागातील शाळा, पालिकेमार्फत आयोजित प्रत्येक स्पर्धेमध्ये निर्भेळ यश संपादित करत असून यावेळीदेखील शाळेने प्रथम क्रमांकाने यश मिळवत यशाचा उंच झेंडा कायम राखला आहे. शाळेतील विद्यार्थी शिक्षकांची मेहनत, उत्तम नियोजन आणि अचूक निवड याचे हे फलित असल्याचे मत शाळेचे मुख्याध्यापक श्री भिकाजी सावंत यांनी व्यक्त केले. तसेच सतत जिंकण्याचा आत्मविश्वास शाळेच्या मुख्याध्यापकांनी निर्माण केला आहे व त्यामुळेच नवी मुंबईत शाळेचे नाव गाजत असल्याचे मत पालक आणि ग्रामस्थांनी व्यक्त केले. मुलांच्या यशामध्ये संगीत शिक्षिका कविता सरणींगे मॅडम ,स्पप्ना पाटील मॅडम , अश्विनी भोईर मॅडम, मुख्याध्यापक श्री सावंत सर, समालोचक श्री रविकांत सर यांनी मेहनत घेतली तसेच पेटीवादक श्री प्रमोद लोकरे, सौ वर्षा लोकरे, तबला वादक श्री उमेश पाटील यांनीदेखील योगदान दिले. शाळेच्या या यशामुळे शाळेतील विद्यार्थी व शिक्षकांवर सर्व स्तरांतून कौतुकाचा वर्षाव होत आहे.



Comments
Post a Comment