ई पासची अट रद्द करा
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन काळापासून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात किंवा दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी राज्य शासन ई पास देण्याची योजना राबवत आहे. मात्र राज्य अनलॉक होत असताना या ई पासचे औचित्य आता फार राहिलेले नाही. एसटीतून आंतरराज्य प्रवास करण्यासाठी ई-पासची गरज नसल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे, मग खासगी गाडीतून प्रवास करताना ई पास बंधनकारक करण्याचे प्रयोजन काय हे अनाकलनीय आहे. तसेच अनेक दलाल ई-पास मंजूर करण्यासाठी पैसे घेत असल्याचे प्रकार घडत आहेत, तसेच बनावट ई पास वितरित करणाऱ्या लोकांचेदेखील पेव फुटले आहे. अनेक जिल्हयांच्या सीमांवर तर ई-पास तपासणी करणारी यंत्रणाच अस्तित्वात नाही. ओळखीच्या लोकांसोबत खासगी गाडीतून प्रवास करताना ई-पास बंधनकारक आणि अनोळखी प्रवाशांसोबत एसटीतून प्रवास करताना मात्र पासची गरज नाही ही सरकारी भूमिका न पटणारी असून त्यावर जनसामान्यांतून नकारात्मक प्रतिक्रिया उमटत आहेत. रस्त्यांवरील खड्डे, वाहतूककोंडी यांमुळे रस्ते प्रवास दिवसेंदिवस अधिक वेदनादायी ठरत आहे. सामान्यांना लोकलमध्ये प्रवेश नाही. एसटी-बेस्टमध्ये गर्दी असल्याने सर्वसामान्यांना खासगी वाहतुकीचाच आधार आहे. अनेक जणांना कामानिमित्त खाजगी वाहनांतून आंतरराज्य प्रवास करावा लागतो. अशा वेळी ई-पास अडचणीचा ठरतो. सर्वसामान्यांना होणारा त्रास व त्यातून होणारी आर्थिक लूट थांबवण्यासाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवासासाठी ई-पासची अट तातडीने रद्द करावी असे मत आहे.

Comments
Post a Comment