ट्रान्स हार्बर सुरू करा
कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभुमीवर अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी तिनही मार्गांवरील लोकलसेवा सध्या सुरु आहे. मात्र मध्य व हार्बर मार्गाला जोडणा-या ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल अदयापी सुरु करण्यात आलेल्या नाहीत. वास्ताविकतः नवी मुंबईत राहणारा बहुतांश नोकरदार वर्ग हा मुंबईत नोकरी धंदयानिमित्त प्रवास करत असतो. तसेच ठाणे दिशेकडुन नवी मुंबईच्या दिशेने कामानिमित्त प्रवास करणारे लोकदेखील मोठया संख्येने आहेत. या मार्गावर प्रवास करणा-यांची संख्या गेल्या काही वर्षांपासुन मोठया प्रमााणावर वाढलेली आहे. त्यामुळे ऐरोली ते कोपरखैरणे भागांत राहणा-या लोकांना मुंबईच्या दिशेने प्रवास करण्यासाठी तसेच कल्याण दिशेकडून नवी मुंबईत येणा-यांसाठी ट्रान्स हार्बर मार्गाचा मोठा आधार आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील लोकांसाठी लोकल सुरु झाल्यानंतरदेखील अदयापी हा लोकलमार्ग प्रवाशांकरीता बंद असणे अनाकलनीय आहे. ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांंवर हा एक प्रकारचा अन्यायच आहे. वास्ताविकतः इतर तिनही मार्गांपेक्षा ट्रान्स हार्बर मार्गावरील गर्दी आटोक्यातील असल्यामुळे या मार्गावरील रेल्वेवाहतूक सुरु करणे सहजशक्य आहे. तसेच सर्वसामान्य लोकांसाठी रेल्वेसेवा खुली करण्याअगोदर या मार्गावर प्रायोगिक तत्वावर चाचणीदेखील करता येऊ शकेल. मात्र गेल्या पाच सहा महिन्यांपासुन हा मार्ग पूर्णतः बंद असण्याची कारणे कळायला मार्ग नाही. याचा फटका ट्रान्स हार्बरवरुन प्रवास करणा-या हजारो लोकांना बसत आहे. रिक्शा, टॅक्सी, खाजगी बस यासाारखे खाजगी प्रवासी वाहतूकवाले या अडचणीचा फायदा उचलत असुन दररोज लोकांची आर्थिक कोंडी करत अवाच्या सव्वा भाडे वसूल करताना दिसत आहेत. परिणामी, याचा मोठा आर्थिक भार नागरीकांना सहन करावा लागत आहे. यासाठी अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांसाठी ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकलसेवा तात्काळ सुरु करुन नवी मुंबईतील नोकरदार वर्गााला दिलासा दयावा.

Comments
Post a Comment