गंभीर गुन्हे करणारे मोकाट
कायदे, नियम केवळ सर्वसामान्यांपुरतेच असतात का हा आपल्याला वारंवार पडणारा प्रश्न आहे. प्रतिष्ठीत, सुप्रसिध्द, कुप्रसिध्द लोक कायदयाची पायमल्ली करत असताना त्यांच्यावर अपवादानेच कारवाई होताना दिसते तीदेखील फार मिडीया ट्रोलनंतर. सर्वसामान्यांना ना वाहतूक नियमांतुन सुट मिळत ना टोलमधुन. मात्र कुख्यात गुंड गज्या मारणे जेलमधुन सुटल्यानंतर नवी मुंबईतून पुण्यापर्यंत शेकडो वाहनांसह वाहतुकीचे नियम तोडून, टोल न भरता काढलेली मिरवणूक कुणालाच कशी दिसली नाही की दिसत असुनही नसती कटकट नको म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले गेले? हे कळायला मार्ग नाही. आतातर तळोजा कारागृहातून पुण्यापर्यंत मिरवत आलेला हा कुख्यात गुंड फरार झाल्याचे समजते. किरकोळ गुन्हे करणारे वर्षानुवर्षे तुरुंगात खितपत पडतात व कायदयातील पळवाटांचा आधार घेत गंभीर गुन्हे करुनदेखील अल्पकाळातच मोकळे फिरणारे अनेक दिसतात. यावरुन कायदयाची अंमलबजावणीदेखील सोईनुसार होते हे स्पष्ट आहे. कायदयाला हातातील बाहुले समजणा-या व त्याच्याशी खेळणा-यांना वेळीच वठणीवर आणणे गरजेचे आहे. तरच गुन्हेगारांची संख्या कमी होईल.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment