अशी व्यक्ती संविधानिक पदावर नकोच
- Get link
- X
- Other Apps
विद्यमान वनमंत्र्यांवर होत असलेल्या आरोपांमुळे राज्याचे महत्वपूर्ण असे वनखाते चर्चेला आले आहे. विपुल वनसंपदा लाभलेल्या महाराष्ट्रासारख्या राज्याचा वनखात्याचा प्रमुख हा निसर्गसंपत्तीविषयी प्रेम असणारा हवा. त्याच भावनेतुन वने व त्यावर अवलंबुन प्राणीमात्रांच्या संवर्धनासाठी व्यापक प्रयत्न आपल्या कारकिर्दीत करणे वनमंत्र्यांकडून अपेक्षित आहे. मात्र तशा प्रकारचे प्रयत्न व ठोस कार्य सध्याच्या वनमंत्र्यांकडून गेल्या दीड वर्षांत दिसुन आलेले नाहीत. या अगोदरच्या सरकारमधील वनमंत्री सुधीर मुनगुंटीवार यांनी वित्तसारख्या महत्वाच्या खात्याचा कारभार सांभाळुन वनमंत्री पदाला आपल्या परीने रास्त न्याय दिला असेच म्हणावे लागेल. वनांच्या संवर्धनासाठी त्यांनी राबविलेल्या अनेक योजना विशेष लक्षात राहतात. यासाठी त्यांनी बदल्यांच्या खेळात न पडता योग्य प्रशासकीय समन्वय राखला. मात्र सध्याच्या वनंमंत्र्यांवर होत असलेले गंभीर आरोप व मंगळवारी त्यांच्या समर्थनार्थ कोविड प्रतिबंध नियमांचे उल्लंघन करुन जमवलेला जमाव राज्याच्या मंत्रीपदाला शोभनिय नाहीत. संविधानिक पदावरील व्यक्ती हा राज्याचे व खात्याचे हित पाहण्यासाठी सक्षम असावा लागतो. यासाठी किमान मंत्रीपदावरील लोकप्रतिनीधीची योग्य निवड राज्याला विकासाकडे घेऊन जाणारी ठरते. एखादा मंत्री आपल्यावर सोपविलेली जबाबदारी योग्यरित्या पार पाडत नसेल तर वर्षाकाठी त्याच्या कामगिरीचा आढावा घेऊन त्या आधारे त्याला पुढील वर्षासाठी पुनर्नियुक्ती देण्याची कठोर मानसिकता मुख्यमंत्र्यांनी दाखवली तर सरकारच्या भूमिकेची सर्वत्र वाहवा होईल व मंत्रीदेखील खात्यातील सकारात्मक बदलांसाठी मन लावून काम करतील. गंभीर गुन्हयाचे आरोप असलेले, खात्याविषयी आस्था नसलेले व सरकारी नियम पायदळी तुडवणा-या मंत्र्यांना पदापासुन दुर ठेवणेच राज्यहिताचे आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment