समाजस्वास्थ्य बिघडवणाऱ्या मालिका

टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या बहुतांश मराठी मालिकांची पातळी कमालीची घसरत चालली आहे. कौटुंबिक वादविवाद, विवाहबाह्य संबंध, सूड उगवण्याच्या भावनेतून कोणत्याही थराला जाणारी पात्रे या सर्वाचा दर्शकांच्या मनावर कोणता परिणाम होत असेल याचा विचार करताना कुणीही दिसत नाहीत. चित्रपट व वेबसिरीज यांचीदेखील यापेक्षा वेगळी परिस्थिती नाही. विकृतीला प्रोत्साहन देणाऱ्या अशा चित्रीकरणातून काय साध्य करायचेय तेच कळत नाही. वाचलेल्या गोष्टी एकवेळ लक्षात राहत नाहीत, परंतु पाहिलेल्या गोष्टी दीर्घकाळ स्मरणात राहतात. त्यामुळे केवळ टीआरपी साठी सुरू असलेल्या विकृत व समाज बिघडवणाऱ्या मालिकांचे भविष्यात गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहेत. एका मराठी मालिकेच्या प्रोमोमध्ये ट्रेन प्रवास करणाऱ्या एका मुलाच्या हातावर, एका विकृत व्यक्तीने सेफ्टीपिन टोचली. प्रसंग इथेच थांबत नाही, मुलाचा रॉडवरचा हात सुटतो आणि तो ट्रेनमधून खाली पडतो. पुढे त्या मुलाचं काय होणार हे सर्वस्वी लेखकाच्या, दिग्दर्शकाच्या किंवा टीव्ही वाहिनीच्या मानसिकतेवर अवलंबून आहे! सूड उगवण्याच्या प्रसंगाचे रूपांतर म्हणून चित्रित केलेला हा प्रसंग समाजात विकृत मानसिकतेला खतपाणी घालणारा नाही का? आज सर्वसामान्यांसाठी ट्रेन बंद आहेत मात्र उद्या ट्रेन पूर्ववत सुरू झाल्यावर लोकांची झुंबड ट्रेनवर उडेल, वादावादीचे प्रसंग उद्भवतील, अशात कोणी रागाच्या भरात या एपिसोडमध्ये पाहिलेली कृती प्रत्यक्षात केली तर याला जबाबदार कोण?



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई


Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा