प्राथमिक शाळा पुढील वर्षी सुरू कराव्यात

मागील दीड वर्षांपासून बंद झालेल्या शाळांच्या घंटा हळूहळू वाजायला लागलेल्या आहेत. महाविद्यालयीन व शालेय विद्यार्थ्यांचे लसीकरण झालेले नसताना शाळा सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. कोरोनाचे नवनवे प्रकार परदेशातून भारतात दाखल होत असताना शालेय विद्यार्थ्यांना लसीविना शाळेमध्ये गोळा करणे घातक ठरू शकते. मागील संपूर्ण शैक्षणिक वर्ष ऑनलाइन शिक्षणाद्वारेच पूर्ण करण्यात आले. यंदाच्या वर्षाचेदेखील दोन तीन महिनेच शिल्लक राहिलेत. ओमायक्रोन या नव्या विषाणूची भीती सर्वत्र पसरलेली आहे. सार्वजनिक प्रवास, स्थळांवर केवळ लसीचे डोस घेतलेल्या लोकांनाच प्रवेश दिला जातोय. अशा वेळी ज्यांच्यापर्यंत अद्याप प्रतिबंधात्मक लस पोहोचलीच नाही त्या विद्यार्थ्यांच्या शाळा सुरू करण्याचा निर्णय अनाकलनीय आहे. आज शाळांतील वर्गांची पटसंख्या पहिली तर सोशल डिस्टन्सिंगसारखे नियम लहान मुलांकडून कसे पाळले जाणार हाही प्रश्न आहेच. त्यामुळे किमान प्राथमिक वर्ग सुरू करण्याच्या निर्णयाचा फेरविचार करून शासनाने थेट पुढील शैक्षणिक वर्षातच प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला तर तो संभ्रवस्थित शाळा, पालक व विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक ठरेल असे वाटते. 




वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त