वऱ्हाडयांच्या संयमाची परीक्षा
अत्यंत कळीच्या मुद्द्याला हात घातला आहे. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईमध्ये नववरवधूचे कपडे, मेकअप, फोटो सेशन यामध्ये खर्ची पडणारा वेळ वऱ्हाडी मंडळींच्या संयमाची प्रतीक्षा पाहणारा ठरत आहे. व्यस्त जिवनमान व एका दिवशी एकापेक्षा अधिक कार्ये यामुळे पाहुणे मंडळींना लग्नासाठी फार वेळ थांबण्यास जमेनासे झालेय. त्यामुळे लग्न लागल्यानंतर वधू वर याना भेटून निघण्याच्या घाईत अनेक जण असतात. अशात लग्न लागल्यानंतर होणाऱ्या विधिदरम्यान त्यांना भेटता येत नाही. त्यांनतर होणारा कपडे बदलण्याचा 'विधी' प्रतीक्षा आणखी काळ वाढवणारा ठरतो. त्यात प्रत्येक क्षणाचा इव्हेंट कॅमेऱ्यात टिपण्यासाठी सज्ज असणारे फोटोग्राफर नवरा नवरीची पाठ सोडायला तयार नसतात. प्रत्येक विधिदरम्यान असंख्य पोझ इच्छिणाऱ्या फोटोवाल्यांची कसरत पाहणाऱ्यांनाही कंटाळवाणी बनून जाते. मात्र या सर्वात ज्याच्या प्रतीक्षेत पाहुणे असतात तो मूळ स्वागत समारंभ सुरू होण्यास खूप वेळ जातो. त्यानंतर मग वधू वराला भेटण्यासाठी लांबलचक रांगा लागतात. यादरम्यान अनेक वऱ्हाडी कंटाळून कुटुंबियांनाच भेटून काढता पायदेखील घेतात. त्यामुळे लग्नसमारंभांमध्ये विधीनंतरचे स्वागत समारंभासाठी कपडे बदलणे व फोटोग्राफरना 'योग्य' सूचना देऊन त्यांची भूमिका थोडी आवरती घेतली तर स्वागत समारंभ वेळेत सुरू होईल व वऱ्हाडी मंडळीदेखील नवदाम्पत्यास व्यवस्थित भेटून समाधानाने निरोप घेतील.
वैभव मोहन पाटील घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment