कारवायांबाबत साशंकता

वास्तविक अनधिकृत बांधकामे हा सर्वच महानगरपालिकांच्या दृष्टिकोनातून डोकेदुखीचा विषय आहे. रातोरात बनवली जाणारी बेकायदा बांधकामे, झोपडपट्टी निर्माण, वाढीव मजले, अतिक्रमणे अशा प्रकारे नियमबाह्य बांधकामांना निर्माण करणारे अनेक भूमाफिया व त्यांना अभय देणारे प्रशासकीय घटक महानगरपालीकांमध्ये सक्रिय आहेत. सर्वच बाबतीत आर्थिक व्यवहार दडलेले असल्याकारणाने अशी प्रकरणे उघड होऊ न देता दाबण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. मात्र सध्या राजकीय व्यक्ती त्याचा एकमेकांवर कुरघोड्या करण्यासाठी व राजकीय लाभासाठी वापर करताना दिसू लागले आहेत. राजकीयदृष्ट्या एखाद्या नेत्याची प्रतिमा बिघडवण्यासाठी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा आधार घेतला जात असेल तर ते कितपत योग्य आहे याचा विचार व्हायला हवा. खरोखरच एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीने आपल्या मालकीच्या बांधकामामध्ये काही अनियमितता केली असेल तर त्यावर बांधकाम झाल्यानंतर लगोलग कारवाई व्हायला हवी. केवळ राजकीय लाभासाठी व निवडणुका डोळ्यासमोर ठेवून प्रशासकीय यंत्रणांच्या आधारे केल्या जाणाऱ्या अशा कारवाया समन्यायी नाहीत. अनधिकृत बांधकामांवरील कारवाया नियमित स्वरूपात व बड्या भूमाफियांविरुद्ध असाव्यात ज्याने शहरे बकाल होण्यापासून वाचतील. केवळ राजकीय हित डोळ्यासमोर ठेवून करण्यात येणाऱ्या कारवाया साशंक आहेत. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त