मास्कसाठी सरकारी सक्तीची वाट पाहू नका
कोविड आजाराची साथ पुन्हा एकदा राज्यात हळूहळू पसरत चालली आहे. रोज रुग्णसंख्येत मोठया प्रमाणावर वाढ होत असुन मुंबई, ठाणे, पुणे, पालघर, रायगड या जिल्हयांमधील रुग्णवाढ चिंता वाढवणारी आहे. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ठिकठिकाणी वाढत चाललेली गर्दी व मास्कचा बंद होत चाललेला वापर ही कारणे या संसर्गवाढीला कारणीभुत ठरु शकतात. शासनाकडून अदयाप पुन्हा कुठल्याही प्रकारची सक्ती व निर्बंर्धांची घोषणा केलेली नसली तरी कोरोनाच्या याअगोदरच्या लाटांप्रमाणे संसर्ग मोठया प्रमाणावर पसरु नये यासाठी सर्वांनी आवश्यक प्रतिबंधात्मक दक्षता घेणे अत्यंत आवश्यक झाले आहे. सरकारी सक्तीची वाट न पाहता किमान मास्क तरी प्रत्येकाने सर्वजनिक ठिकाणी व प्रवासामध्ये वापरलाच पाहिजे. तसेच सर्वांनी आपले लसीकरण पूर्ण करुन घेणेही क्रमप्राप्त आहे. व्यक्तीगत स्वच्छता, सोशल डिस्टंसींग, बाधा झाल्यास वेळेत औषधोपचार घेणेही महत्वाचे आहे. लसीचा दुसरा डोस न घेतलेल्यांची संख्या लक्षणीय आहे. कोविडशी लढण्यासाठी मास्क व संपूर्ण लसीकरण ही दोनच हत्यारे आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यामुळे लसीचा एकही डोस न घेतेलेल्या तसेच दुसरा डोस घेण्यासाठी न गेलेल्या लाभार्थ्यांनी तातडीने आपले संपूर्ण लसीकरण करुन घेणे हितावह आहे. कोविडची कुठलीही लक्षणे आपल्याला दिसल्यास अंगावर न काढता किंवा जुजबी उपचार न करता त्वरीत आवश्यक चाचण्या व योग्य औषधोपचार घेणे गरजेचे आहे. राज्यात कोविडची साथ पून्हा पसरु न देण्याची जबाबदारी आपली सर्वांची असुन त्या दृष्टीने खबरदारी सर्वांनी घ्यायला हवी.
Comments
Post a Comment