प्रसारमाध्यमांची जबाबदारी वाढती
आंदोलने, मोर्चे, निषेध हा हिंसक, आक्रमक केल्याशिवाय प्रभावी ठरत नाही हा गैरसमज समाजात दृढ होत चालल्यामुळे लोकांच्या भावना भडकावण्याकडे लोकप्रतिनिधींचा कल वाढता आहे. यामुळेच गेल्या काही वर्षांत शांततापूर्ण, लोकशाही मार्गांच्या आंदोलनांची जागा मोडतोड, जाळपोळ, हल्ल्यांनी घेतली आणि त्यामुळे सामाजिक वातावरण दूषित झाले आहे. सोशल माध्यमांच्या वापराचा अतिरेक, प्रत्येकाच्या हातात आलेले अँड्रॉइड मोबाईल, सहजसाध्य व मुबलक इंटरनेट सेवा यामुळे विद्रोही संदेश, साहित्याचा प्रसार झपाट्याने पसरत चालला आहे. यात प्रसारमाध्यमे नको तितकी रंजक भर घालतात ज्याचा थेट परिणाम आंदोलनाच्या उग्रतेवर होतो. प्रसिद्धीचा हव्यासदेखील अशा आंदोलनांच्या मागे असतो. कुठल्याही हिंसक आंदोलनामध्ये सर्वसामान्य जनतेचा सहभाग अजिबात नसतो तर पक्षीय, पंथीय, जातीय विचारधारेशी निगडित लोकांचा त्यात भरणा जास्त असतो. त्यामुळे लोकशाहीचा चौथा स्तंभ समजल्या जाणाऱ्या प्रसारमाध्यमांनी ह्या अनुचित घटनांना आळा घालण्यासाठी योग्य भूमिका वठवावी, सोशल माध्यमांवरील अफवांना खतपाणी घालणारे घटक नियंत्रित करावेत आणि निषेध नोंदवण्याचे योग्य व स्वीकारार्ह मार्ग लोकांपर्यंत पोहोचावेत तरच अशा समाजविघातक कृत्ये करणाऱ्या लोकांवर वचक राहील.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment