शाळा सुरू, काळजी घ्या

कोरोनाची दोन वर्षे विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती मंदावणारी ठरली. घरी बसून घेतलेले शिक्षण सर्वच मुलांना फलदायी ठरलेले नाही. अभ्यासक्रम, परीक्षा याबरोबरच मुलांच्या कला व क्रीडागुणांनाही ब्रेक लागल्याने हे नुकसान भरून न येणारे आहे. त्यामुळे कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर यंदा शाळा प्रत्यक्षात सुरू करणे क्रमप्राप्तच होते. मात्र शाळा सुरू झाल्यानंतर आता शाळा व्यवस्थापनाची जबाबदारी आणखी वाढली आहे. प्राथमिक शाळांमधील मुलांचे लसीकरण अद्याप न झाल्याने संसर्गाचा धोका हा सर्वाधिक याच गटात आहे. त्यात शालेय वर्गांमध्ये सामाजिक अंतर राखणे तसेच मुलांना स्वच्छ वातावरण उपलब्ध करून देणे शाळांची जबाबदारी आहे. मुलांच्या शाळेपर्यंतच्या प्रवासात स्कुल बस व व्हॅनमध्ये गर्दी होऊ न देण्याची खबरदारी घ्यायला हवी. मुलांना शालेय अभ्यासक्रमासोबतच व्यक्तिगत स्वच्छता व संसर्गजन्य आजारांबाबत जागृत ठेवणे शिक्षकांची जबाबदारी आहे. पालकांनीही आपल्या पाल्यांना त्याबाबत योग्य सूचना वेळोवेळी देऊन शाळेत पाठवणे आवश्यक आहे. मास्कचा वापर हा शाळेत विद्यार्थी, शिक्षक व कर्मचाऱ्यांनी करायलाच हवा. शाळेतील वर्गनिहाय पटसंख्या व वर्गखोल्यांची क्षमता याचे गणित शाळांना जुळवावेच लागेल. वर्गात मुलांची दाटीवाटी होणार नाही याची खबरदारी घ्यावी. एकंदरीत शाळा सध्या पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात आल्याने कुठल्याही प्रकारचा संसर्ग पसरू न देण्याची जबाबदारी शाळा, शिक्षक व पालकांचीही आहे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त