पायावर उभे करणारे शिक्षण हवे
दहावी बारावीनंतर विद्यार्थ्यांच्या पदवी व व्यावसायिक शिक्षणाच्या वाटा खुल्या होतात. पूर्वीचे शिक्षण एका साचेबद्ध पद्धतीने घेतले जायचे. बारावीनंतर पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून नंतर उच्च शिक्षणाचे पर्याय निवडले जायचे. कालपरत्वे शिक्षण पद्धतीत बदल होत गेले. करीअर व रोजगाराच्या अनुषंगाने मुलांचा व्यावसायिक शिक्षणाकडे कल वाढत गेला. दूरस्थ शिक्षण पद्धतीने पदवीचे शिक्षण पूर्ण करण्याचे पर्याय खुले झाल्याने मुलांचा व्यावसायिक शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करण्याचा मार्ग अधिकच सुकर झाला. त्यामुळे बारावीपर्यंतचे शिक्षण एखाद्या महाविद्यालयात घेतलेले विद्यार्थी इन हाऊस कोट्यात सहज प्रवेश मिळत असताना देखील पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या अभ्यासक्रमांकडे वळत आहेत. आज उच्च शिक्षण घेवुनदेखील बेरोजगारीचे प्रमाण वाढते आहे. ठराविक शाखांमधील उमेदवारांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. मात्र उच्च शिक्षित उमेदवारांची प्रचंड संख्या व त्या प्रमाणात रोजगार मात्र उपलब्ध होत नसल्याने व्यावसायिक शिक्षणाच्या वाटा विद्यार्थी चोखळतात. स्वयंरोजगार व स्वव्यवसायाच्या संधी यातून मिळत असल्याने पदवीपर्यंतचे शिक्षण आता ऐच्छिक ठेवून मुलांना स्वतःच्या पायावर उभे करणारे व्यावसायिक शिक्षण उपलब्ध करून देणे काळाची गरज आहे.
Comments
Post a Comment