निरोगी शरीरासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे
- Get link
- X
- Other Apps
By
vaibhavpatil
-
पावसाळा हा वातावरणातील गारव्यामुळे सुखावणारा असला तरी तो अनेक साथीचे आजारदेखील घेऊन येत असतो ही बाब ध्यानात ठेवली पाहिजे. त्यामुळे साथीच्या आजारापासून प्रत्येकाने स्वतःचे व कुटुंबाचे रक्षण करण्यासाठी दक्ष असणे गरजेचे आहे. पावसाळ्यात मुख्यत्वे सर्दी, ताप, डोकेदुखी, डेंग्यू, हिवताप यासारखे जलजन्य आजार पसरत असतात. दूषित पाणी व वातावरणातील बदलांमुळे हे आजार डोके वर काढतात. त्यामुळे पावसात फिरताना तसेच पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत योग्य काळजी न घेतल्यास आपण या आजारांना बळी पडतो. पावसाळ्यात पाणी गाळून व उकळूनच प्यायला हवे. ओलसर कपडे व पावसाच्या पाण्यात भिजणे शक्यतो टाळले पाहिजेत. महत्वाचे म्हणजे वर उल्लेख केलेल्या आजारांची कुठल्याही प्रकारची लक्षणे दिसल्यास तातडीने आवश्यक चाचण्या व उपचार करायला हवेत. पावसाळ्यात राज्यातील आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झालेल्या आहेत. साथपरिस्थितीचा मुकाबला करण्यासाठी आवश्यक उपाययोजना सरकारने हाती घेतलेल्या आहेत. त्यामुळे आजारपणात सरकारी दवाखान्यांत औषधोपचार लाभदायी ठरेल. आज ग्रामीण व शहरी भागांत अनेक सरकारी दवाखाने व रुग्णालये लोकांच्या सेवेत अविरत दिवसरात्र कार्यरत असून या आरोग्य संस्थांमध्ये विविध सरकारी योजना व साथीच्या आजारांबद्दलची माहिती, संसर्गजन्य व असंसर्गजन्य आजारांवर मोफत औषधोपचार उपलब्ध आहेत. त्याबद्दलची माहिती घ्यावी व त्यांचा लाभ घ्यावा. केंद्र व राज्य सरकारच्या सहयोगातून आज शासकीय आरोग्य संस्था कात टाकत असून तेथे साथीचे आजार व असाध्य आजारांवर अखर्चीक उपचार होत आहेत. खाजगी रुग्णालयांत होणाऱ्या महागड्या शस्त्रक्रिया सरकारी रुग्णालयांतही करण्यात येत आहेत. त्यामुळे सामान्य, गरीब, गरजू रुग्णांनी या सुविधांचा लाभ घ्यावा. आजारपण हे मानसिक, शारीरिक व आर्थिक स्वास्थ्य हरवणारे असल्यामुळे निरोगी शरीरासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
- Get link
- X
- Other Apps
Comments
Post a Comment