वाढती लोकसंख्या चिंतेची बाब
महानगरांमधील वाढती लोकसंख्या लोकांच्या जीवावर उठू लागली आहे. वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात वाहनेही दिवसांगणिक वाढत आहेत. मुंबई, ठाणे, नवी मुंबई सारख्या शहरांतील आरटीओ कार्यालयात दररोज हजारोंच्या संख्येत नव्याने वाहने नोंदणी होत आहेत. वाहनांचा हाच दहशतवाद रस्त्यावर धोकादायक ठरत असून अपघातांमध्ये रोज अनेक निष्पाप जीव नाहक बळी जात आहेत. या वाहनधारकांमध्ये वेगाशी स्पर्धा करणारी तरुणाई मोठ्या प्रमाणावर सक्रिय असल्याने अपघातांचे प्रमाणही वाढते आहे. चारचाकी वाहन विकत करणे हे आजकाल प्रतिष्ठेचे लक्षण समजले जाऊ लागल्याने फारसा वापर नसतानाही वाहनखरेदीचे वेड वाढू लागले आहे. यामुळे पार्किंग व ट्रॅफिकची समस्या भविष्यात उग्र रूप धारण करेल ही काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे. यासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा अधिकाधिक वापर व वाहनविक्रीवर कठोर निर्बंध आणण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई

Comments
Post a Comment