कळवा ऐरोली मार्गिका कधी खुली करणार?
नवी मुंबईमध्ये मोठमोठ्या औद्योगिक व आयटी कंपन्यांच्या कार्यालयांमुळे कल्याण डोंबिवली कडून इथे येणाऱ्या कामगार वर्गाची संख्या मोठी आहे. तसेच शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही लक्षणीय आहे. मध्य मार्गावरील ठाणे स्थानकात उतरून ट्रान्स हार्बर मार्गावरून त्यांना प्रवास करावा लागतो. ठाणे स्थानकातील नऊ व दहा नंबरच्या फलाटांवर यामुळे मोठी गर्दी सकाळ सायंकाळच्या वेळी पाहायला मिळते. गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेत असणारा कळवा - ऐरोली इलेव्हेटेड मार्ग प्रत्यक्षात अवतरत नसल्याने लाखो प्रवाशांना त्याचा फटका बसत आहे. पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन झालेला हा मार्ग रेल्वेच्या जागेतील अतिक्रमणामुळे रखडला असेल तर त्यामागे काय राजकारण शिजते आहे हे पाहण्याची तसदी कुणी का घेत नाही असाही प्रश्न उपस्थित होतो. नवी मुंबईत प्रवास करणाऱ्या लोकांसाठी अत्यंत महत्वाच्या अशा ह्या मार्गाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी येथील लोकप्रतिनिधी, खासदार व विशेषतः मुख्यमंत्री महोदयांनी लक्ष देणे गरजेचे आहे. जलवाहतूक सुरू झाली, ऐरोली- काटई मार्ग खुला होत आहे, अलीकडेच काम सुरू झालेले दिघा स्थानकही लवकरच सुरू होत आहे मग लोकांचे वेळ-श्रम-पैसा वाचवणाऱ्या कळवा-ऐरोली मार्गिकेचे घोडे आणखी किती दिवस भिजत ठेवणार आहात?
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment