जलसाक्षरता हवीच
नवी मुंबई पाण्याच्या बाबतीत संपन्न असली तरी पाण्याचा अपव्यय मात्र सर्वत्र पाहायला मिळतो ही बाब खरी आहे. आज नागरी वसाहतींमध्ये जलमापक यंत्रे बसवण्यात आलेली आहेत व ठराविक वेळेत पाणीपुरवठा होतो तर गावठाण क्षेत्रात मात्र वेळ व जलमापकांचे बंधन नाही. पाणी हा घटक जीवनावश्यक बाबीत मोडतो त्यामुळे त्याचा योग्य व गरजेपुरताच वापर व्हायला हवा. नवी मुंबई शेजारील ठाणे, मुंबईसारख्या पालिकांमध्ये जाणवणारी पाणीटंचाई नवी मुंबईत कधीही जाणवत नाही. स्वतःच्या मालकीचे धरण तसेच पाणीपट्टीत गेल्या कित्येक वर्षांत वाढ केलेली नसल्याने नवी मुंबईकर पाण्याच्या बाबतीत खरोखर भाग्यवानच आहेत. मात्र गावठाण भागासह काही नागरी वसाहतींमध्येदेखील दिवसरात्र भर रस्त्यावर पाण्याची नासाडी होत असल्याचे चित्र वेदनादायी आहे. कधी इमारतींवर ओव्हरफ्लो होणाऱ्या पाण्याच्या टाक्या, कधी वाहने धुताना पाण्याचा अपरिमित वापर, कधी तुटलेल्या जलवाहिन्या तर कधी खुले ठेवले जाणारे नळ असे चित्र रस्तोरस्ती दिसते तर घराघरांत पाण्याचा होणारा अपव्यय व अनावश्यक वापरदेखील पाण्याच्या नासाडीला कारणीभूत ठरतो. त्यामुळेच स्वच्छ, सुंदर व सुरक्षित समजले जाणारे नवी मुंबई शहर आता खऱ्या अर्थांने पाण्याचे महत्व जाणून जलसाक्षर होण्याची गरज आहे असे वाटते.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment