शिधापत्रिकांचा लाभ खऱ्या लाभार्थ्यांना मिळावा

राज्यातील शिधापत्रिका ऑनलाईन प्रणालीत आणण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहेत. यासाठी शिधापत्रिका धारकांना आपली शिधापत्रिका आधार कार्डशी लिंक करावी लागणार आहे. दुबार, रद्द झालेल्या व मयत व्यक्तींचा समावेश असलेल्या शिधापत्रिका यामुळे कालबाह्य होणार आहेत. गरज असलेल्या लाभार्थ्यांनाच यामुळे लाभ मिळणार असल्याने सरकारची ही कल्पना स्तुत्यच आहे. सध्या साठ हजारांच्या वर मिळकत असलेल्या लोकांना पांढरी, साठ हजारांच्या खाली उत्पन्न असलेल्यांना केशरी तर विनाधार लोकांना पिवळी शिधापत्रिका दिली जाते. पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना कुठलाही लाभ मिळत नाही, केशरी पत्रिकाधारकांना दोन रुपयांत तांदूळ व तीन रुपयांत गहू मिळतात आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांना या सर्व सुविधा मोफत मिळतात. वास्तविक मिळकतीनुसार सर्व्हे केला तर यातील बहुतांश शिधापत्रिका बाद कराव्या लागतील. त्यामुळे खरेतर सध्या महागाई व कौटुंबिक मिळकत वाढत असल्याने रेशन कार्डसाठी उत्पन्नाची ही मर्यादा आता वाढवण्याची गरज आहे. तसेच गावाकडे व शहरात दोन्ही ठिकाणी शिधापत्रिकांवरील लाभ मिळवणाऱ्या रेशन कार्डधारकांची संख्याही मोठी आहे. शिधापत्रिका ऑनलाईन झाली तर हा लाभ बंद होईल या भीतीने काही लाभार्थी आधार लिंक साठी पुढे येत नाहीत. त्यामुळे सरकारने आता रेशन कार्डवरील पत्त्यानुसार घरोघरी सर्वेक्षण करून सर्वच रेशकार्ड आधार लिंक करण्यासाठी पावले उचलावी तसेच चुकीच्या माहितीच्या आधारे, दुबार व मयत व्यक्तींच्या नावे लाभ मिळवणाऱ्या लाभार्थ्यांचा शोध घेऊन अशा शिधापत्रिका रद्द कराव्यात जेणेकरून या योजनेचा लाभ खऱ्या अर्थाने गरीब, गरजू व निराधार लाभार्थ्यांनाच मिळेल. 




वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त