असामान्य व्यक्तिमत्वाच्या सानिध्याचे समाधान
गझलनवाज पंडित भिमराव पांचाळे यांची भेट
विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींच्या भेटी निरनिराळया निमित्ताने नेहमीच होत असतात. मात्र नुकतेच गजल क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तीमत्व पं. भीमराव पांचाळे यांची ते कार्यालयात काही निमित्ताने आले असता अनपेक्षित भेट झाली. आमचे कार्यालयीन सहकारी व कर्मचारी संघटनेचे श्री विजय बोरसे हेदेखील सोबत होते. पं. भीमराव पांचाळे हे महाराष्ट्रातील नामवंत गजलगायक म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्म: ३० मार्च, १९५१ रोजी अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यातील आष्टगाव येथे झाला. मराठी गजलकारांना प्रोत्साहन मिळण्यासाठी ते गजलसागर संमेलने आणि गजल कार्यशाळा आयोजित करत असतात. अमरावतीमध्ये त्यांनी नऊ वर्षं शास्त्रीय गायनाचे शिक्षण घेतले. वाणिज्य शाखा आणि मराठी-हिंदी भाषा साहित्य तसेच संगीत यांतील पदवी अभ्यासक्रमही त्यांनी पूर्ण केले आहेत. सुरेश भटांचे गजल अभियान उत्तरोत्तर दृढ करण्यात गजलनवाज भीमराव पांचाळे यांचा मोठा वाटा आहे. मान्यवर शास्त्रीय गायनाच्या उस्तादांकडून परिपूर्ण शिक्षण घेऊनही भीमरावांनी मराठी गजल गायनाचे व्रत घेतले. त्यांनी 'गजल सागर' ही संस्था स्थापन केली. त्याद्वारे गजल कार्यशाळा, ग्रंथ प्रकाशन असे स्तुत्य उपक्रम राबविले आहेत. पं. भीमराव पांचाळे यांनी ख्याल, ठुमरी, भक्तिसंगीत, नाट्यसंगीत, भावगीत मराठी गजल असे सर्व प्रकारचे शास्त्रीय-उपशास्त्रीय व सुगम संगीत गायन केले आहे. पं. भीमरावांची गाण्याची पद्धत ही आशयप्रधान गायकी स्वरूपातील आहे असे मानले जाते. त्यांनी नाटके, चित्रवाणीवरील चित्रपट व मालिका तसेच बोलपट यांना संगीत दिले आहे. कॅसेट शब्द सुरांची भावयात्रा व ग़ज़लियात ही पुस्तके त्यांनी लिहीली आहेत. काही वर्षांपूर्वी कर्मचा-यांच्या सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान त्यांच्या गायनाचा आस्वाद घेता आला होता. त्यानंतर विजयजी बोरसे यांच्या माध्यमातून त्यांची झालेली भेट एका असामान्य व्यक्तीमत्वाच्या सानिध्याचे समाधान देऊन गेली.
वैभव
Comments
Post a Comment