नियमित व पारदर्शक कारवाई हवी

महामार्गांवर होणारे बहुतांश मोठे अपघात सार्वजनिक प्रवाशी वाहतुकीचे होतात. टूर्स ट्रॅव्हल्सच्या बसेस, टेम्पो, ट्रक, जीप या अक्षरशः बेदरकारपणे चालवल्या जातात. यांचे चालक बहुतांश प्रमाणात प्रशिक्षित व परवानाधारकदेखील नसतात. मद्यपान करून वाहने चालवणाऱ्यांची संख्याही वाढती आहे. त्यामुळे भरधाव वेगाने वाहने चालवताना त्यावरील नियंत्रण सुटते व मोठा अपघात घडतो. अशा अपघातांमधे अनेक निष्पाप बळी जातात. चालकाच्या चुकीची शिक्षा सहप्रवाशांना भोगावी लागते. अनेकांना कायमचे अपंगत्व देखील येते. त्यामुळे रस्त्यावरील वाहनांचा हा दहशतवाद रोखायचा असेल वाहतूक विभागाने आपली भूमिका चोखपणे बजावायला हवी. वेगाने व विनापरवाना वाहने चालवणाऱ्या चालकांवर नियमित व पारदर्शक कारवाई व्हायला हवी. अशा चालकांवर अजामीनपात्र गुन्हे दाखल व्हायलाच हवेत. मात्र घटना घडल्यानंतर कारवाई होण्यापेक्षा प्रतिबंधात्मक कारवाई करणे योग्य ठरेल. अनेक घटनांमध्ये तर चालकाचाही जीव जातो. त्यामुळे नेमकी कारवाई कुणावर करावी असा प्रश्नही उपस्थित होईल. यासाठी वाहतूक विभागाने सार्वजनिक वाहतूक सेवेवर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. यासाठी चालक मालक यांचे प्रशिक्षण देखील घेता येईल. रस्ते अपघाताबाबत जनजागृती आवश्यक असून आयुष्य खंडित करणाऱ्या या विषयाकडे सरकारी यंत्रणा व नागरीकांनी गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. 




वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त