दोन हजारांच्या अडचणीच्या व अडगळीच्या
मुळात दोन हजारांच्या नोटेने लोकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण केला होता. इतक्या मोठ्या चलनाची नोट बाजारात आणली गेली त्यावेळी तिला मिळणारा प्रतिसाददेखील फारसा नव्हता. उलट या नोटेमुळे ठिकठिकाणी लोकांची अडचणच व्हायची. किरकोळ रकमेचे व्यवहार करणारे नागरिक व व्यापारी या नोटेमुळे बेजारच होते. त्यात अशा प्रकारच्या नकली नोटा बाजारात आल्याच्या बातम्यांनी ही गुंतागुंत अधिकच वाढली होती. त्यामुळे दोन हजाराची नोट छापण्याचा उद्देश अजूनदेखील गुलदस्त्यातच आहे. आता ही नोट बंद करण्याचा आरबीआय चा निर्णय नक्कीच स्वागतार्ह आहे. त्याऐवजी ५०, १००, २०० यासारख्या लहान रक्कमेच्या नोटा अधिक प्रमाणात यायला हव्यात. तसेच दोन हजारांची नोट बँकेत जमा करण्यासाठी ठराविक मुदत ठेऊ नये. लोकांना जसे जमेल तसे ह्या नोटा बँकेत जमा करण्याचे प्रावधान असावे. देशातील बहुतांश व्यवहार आज यूपीआयद्वारे डिजिटल होत असल्याने नगदी व्यवहारांचे प्रमाण बऱ्याच अंशी घटले आहे. मात्र चलनी नोटा आजदेखील किरकोळ बाजारात वापरल्या जात आहेत. डिजिटल व्यवहारांपासून दूर असणारा घटक मोठया प्रमाणावर समाजात असल्याने या नोटा चलनात येणारच मात्र दोन हजारांच्या नोटा ह्या व्यवहारांत अडगळीच्या व अडचणीच्या ठरत आलेल्या आहेत. त्यामुळे त्या चलनातून काढून टाकण्याचा निर्णय योग्यच आहे.
Comments
Post a Comment