अपघात रोखण्यासाठी ठोस उपाययोजना हव्यात

समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खाजगी ट्रॅव्हल बसला बुलढाणा जिल्ह्यात झालेल्या अपघाताची दुर्घटना अतिशय दुर्दैवी आहे. अपघातानंतर बसला लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. समृद्धीवरील हा सर्वात भीषण अपघात आहे. ह्या महामार्गाचे उदघाटन झाल्यापासून सातत्याने अपघातांची मालिका सुरूच आहे. आजवर ३००च्या वर लोकांनी या महामार्गावर विविध अपघातांमध्ये आपला जीव गमावला आहे. त्यामुळे महामार्गाच्या सुरक्षा व्यवस्थेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत. भरधाव वेगात चालणाऱ्या गाड्या, चालकांना संमोहित करणारा महामार्ग, नादुरुस्त वाहने, अप्रशिक्षित चालक याचा नाहक फटका निष्पाप प्रवाशांना बसत आहे. महामार्गांवर अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. खाजगी ट्रॅव्हल्सच्या गाड्यांचे चालक तर बेदरकारपणे गाड्या चालवतात. ह्यांच्यावर चाप बसवायलाच हवा. त्यामुळे असे अपघात पुन्हा होऊ न देण्यासाठी कठोर उपाययोजना आखाव्याच लागतील. वाहनांचे वेग नियंत्रित करायला हवेत, परिवहन विभागाच्या चौक्या जागोजागी असायला हव्यात, चालकांसाठी ठरविक अंतरावर विश्रांती थांबे असावेत, अपघातानंतर त्वरित मदतीसाठी तत्पर यंत्रणा असावी अशा प्रकारच्या सुविधांनी निश्चितपणे अपघातांमध्ये विनाकारण जाणारे बळी थोपवता येतील. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त