टोल वसुलीचे गौडबंगाल

सध्या टोल दरवाढीचा मुद्दा प्रचंड गाजतोय. या मुद्द्यावर सुरुवातीपासूनच आक्रमक असलेला मनसे पक्ष टोल दरवाढीमुळे पुन्हा एकदा सक्रिय होत रस्त्यावर उतरला आहे. वर्षानुवर्षे सुरू असलेल्या टोल वसुलीमागची सरकारची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिली आहे. राज्यात शेकडो ठिकाणी दिवसरात्र सुरू असलेल्या ह्या टोलच्या वसुलीचा परिपाक काय हेदेखील अनाकलनीय आहे. ना रस्ते सुधारत, ना अपघात कमी होताहेत, ना वाहतूक कोंडी होतेय किंवा कुठेही टोलवसुलीत पारदर्शकताही दिसून येत नाही. अशा परिस्थितीत टोलद्वारे जमा होणारा निधी व प्रत्यक्षात टोल वसुली करणाऱ्या संबंधित कंपनीने टोलद्वारे किती पैसा जमा केला, त्याचा हिशोब इमानेइतबारे टोल भरणाऱ्या वाहनधारकांना दाखवण्याची गरज तर आहेच. टोल हा सर्वसामान्य प्रवाशांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. एकीकडे इंधन दरवाढ व दुसरीकडे टोल धाड अशी अवस्था सध्या सर्वसामान्य लोकांची आहे. अनावश्यक टोल वसुली होत असेल तर त्याद्वारे जमा होणारा निधी कुठे जातो याचा लेखाजोखा सर्वांसमोर यायलाच हवा. टोल नाक्यावरील वसुलीचा गांभीर्याने आढावा घेण्याची गरज असताना उलट टोल दरवाढीस मंजुरी कशी दिली जाते हा मोठा यक्षप्रश्नच आहे. टोल आकारणीला सरसकट विरोध असण्याची गरज नाही मात्र त्याचा जमाखर्च पारदर्शकपणे लोकांसमोर यायला हवा. 




वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त