याचा जाब विचारायला हवा
मुंबई आणि उपनगरांत वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. हजारो वाहने मुबंई, ठाणे, नवी मुंबईतील आरटीओ कार्यालयांमध्ये दररोज नोंदणी होत आहेत. काम धंद्यानिमित्त दररोज मुंबईत येणाऱ्या वाहनांची संख्याही मोठी आहे. याचा विपरीत परिणाम वाहतूक कोंडी आणि प्रदूषणावर होत आहे. रस्ते प्रवास सुरक्षित राहिलेला नाही, त्यामुळे मुंबईतील लोकल सेवेवर मोठा भार असून तिथेदेखील सुरक्षा राहिलेली नाही. याच आठवड्यात प्रचंड गर्दीमुळे दरवाजात लटकून डोंबिवली वरून ठाण्याच्या दिशेने लोकलप्रवास करणाऱ्या रिया नावाच्या तरुणीचा लोकल मधून पडून जागीच मृत्यू झाला. असे रेल्वे अपघात रोजच होत असतात. याकडे कुणाचेही लक्ष नाही. ज्यांच्याकडे ती सोडवण्याची क्षमता आहे त्यांच्याकडे इच्छाशक्ती नाही. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये मते मागायला येणाऱ्या उमेदवारांना आता मतदारांनीच या समस्यांवर जाब विचारायला हवा व शासन दरबारी मांडून त्या सोडवण्यासाठी भाग पडायला हवे. मुंबईत येणारे गर्दीचे लोंढे व अनियंत्रित वाहन संख्येवर नियंत्रण आणण्यासाठी ठोस उपाययोजना भविष्यात आखाव्याच लागतील अन्यथा रस्त्यावरील वाहनांचा हा दहशतवाद मुंबईचे जनजीवन विस्कळीत केल्याशिवाय राहणार नाही.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment