खराब रस्त्यांचा कोकणच्या पर्यटनावर विपरित परीणाम

मुंबई गोव्याला जोडणाऱ्या व कोकणातून जाणाऱ्या हया रस्त्यावरून जाण्याचा नुकताच योग आला. ह्या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट आहे. कोकणात जाणारे चाकरमानी व पर्यटक मोठ्या संख्येने ह्या रस्त्यावरून प्रवास करतात. रस्त्यात प्रचंड प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य असून ठिकठिकाणी सुरू असणाऱ्या रस्त्यांच्या कामामुळे वाहतूक कोंडीदेखील होत आहे. भरधाव वेगाने धावणाऱ्या अवजड वाहनांनी सर्वत्र धुळीचे साम्राज्य पसरलेले असते. यामुळे कोकणाकडे नेणारा हा प्रवास अत्यंत त्रासदायक असून वाहनांचे नुकसान करणाराही आहे. मुंबईहून नागपूरकडे जाणारा समृद्धी महामार्ग, मुंबईतील मेट्रो, मोनो, सागरी मार्गांचे अनेक प्रकल्प विक्रमी वेळेत पूर्ण होऊ शकतात तर कोकणी लोकांच्या जीवन मरणाशी जोडलेला हा रस्ता प्रवासालायक बनवायला इतकी वर्षे का लागतात हा खरा प्रश्न आहे. येत्या निवडणुकांमध्ये याचा जाब लोकांनी मते मागायला येणाऱ्या लोकप्रतिनिधींना विचारायला हवा. कोकणाचे खरे सौंदर्य येथील समुद्रकिनारे व ऐतिहासिक - धार्मिक स्थळांमध्ये आहे. त्यामुळे कोकणातले पर्यटन दिवसेंदिवस बहरत आहे. देशभरातून पर्यटक या ठिकाणी कोकणचे सौंदर्य पाहायला येतात. मात्र खराब रस्ते त्यांची निराशा करतात. कोकणात जायला धड रस्तेच नसल्याने त्याचा फटका पर्यटन व्यवसायाला बसत आहे. 



वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई  

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त